एखाद्या विषयावर श्रद्धा असणे आणि श्रद्धा नसणे हे मानवी जीवनात खूप साहजिक आहे. कारण जे एका व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला आवडते ते दुसऱया व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला आवडेलच असे नाही. मानवी मनाचा विकास होणे, मानवी हृदयाचा विकास होणे म्हणजे स्वतःसहित इतरांना समजून घेणे होय! बऱयाच वेळेला मतभिन्नता असल्याने मनभेद निर्माण होतात. हे मनभेद जर टोकाचे निर्माण झाले तर ते मानवी संबंधाना बाधा उत्पन्न करतात. प्रगल्भ व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हा इतरांना समजून घेण्यात कधीही कमी पडत नाही. मी आणि माझे या व्यतिरिक्तही खूप काही विश्वामध्ये आहे आणि त्याचा आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य समजून घेणे म्हणजेच प्रगल्भता होय! याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत दिलेले भाषण होय!
अविद्या म्हणजे अज्ञान किंवा एखाद्या विषयाची माहिती नसणे. अविद्येपोटी अनेक दुष्कर्मे मानवाकडून आतापर्यंत झालेली आहेत. पृथ्वीवर घडणाऱया किंवा घडत असलेल्या कुकर्मांची बीजे ही अविद्येतच दडलेली आहेत. या अविद्येच्या अंधकारातून बाहेर पडायचे असेल तर श्रीसमर्थांनी लिहिलेला ग्रंथराज दासबोध अभ्यासायला हवा. तसेच इतर सद्ग्रंथांचा अभ्यासही करायला हवा. व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा अनेक चुका या अविद्येपायीच घडतात आणि परिणामतः अनेक संस्था, संघटना आणि उद्योग समूह हे लयास जातात. दासबोधाचा व्यवस्थापनाच्या अंगाने अभ्यास केल्यास निश्चितच चुका कमी होऊन जे मूळ आहे तेथपर्यंत जाण्यास निश्चितच मदत होऊ शकते.
श्रीसमर्थांनी अविद्येच्या मुळाशी घातलेला घाव हा दासबोधातील मायोद्भवनाम ज्ञानदशकातील दुश्चित्तनिरुपण समासात वर्णन केला आहे. त्यात समर्थ म्हणतात की,
सांगतां अवगुण गेला !
पुन्हा मागुता जडला !
याकारणे माहांभला !
पाषाणगोटा !!
ज्याचा अवगुण झडेना !
तो पाषाणाहून उणा !
पाषाण आगळा जाणा !
कोटीगुणे !! 11-12/06/08
याचा अर्थ असा आहे की एखाद्याला त्याचा दोष किंवा अवगुण समजावून दिला तर तो तेवढय़ा वेळेपुरता सुटतो पण पुन्हा तो दोष त्याच्यात प्रकट होतो. दगड किंवा पाषाणाचे मात्र असे होत नसल्याने मात्र माणसापेक्षा पाषाण चांगला असे म्हणावे लागते. अनेकदा सांगूनही ज्याचा अवगुण सुटत नाही तो माणूस दगडापेक्षाही हीन दर्जाचा समजावा. त्या माणसापेक्षा दगड बरा असे म्हणावे.
व्यवस्थापनशास्त्रातसुद्धा ज्यांच्याकडून चुका होतात त्या त्यांना योग्यवेळी समजावून सांगितल्या जातात पण काही कर्मचारी, कामगार किंवा अधिकारीही तात्पुरत्या स्वरुपात त्यात बदल करतात मात्र अनेकवेळा हा बदल कायमस्वरूपी होत नसल्याने संबंधित संस्था, संघटना किंवा उद्योग समूहास मात्र खूप नुकसान सोसावे लागते. असे लोक हे व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने त्याज्य ठरलेले असतात. अशा कर्मचाऱयांचे लक्ष हे त्यांना सोपवलेल्या कामात नसते.
अविद्येचा उगम हा दुश्चित्तपणातच आहे. श्रीसमर्थ हे दुश्चित्तपणा आणि आळशी मनोवृत्तीचे शत्रू आहेत. कारण कुठला काळ हा कसा येईल हे सामान्य मनुष्याला सांगता येत नाही आणि भविष्यकाळात काय दडले आहे याचा थांगपत्ताही सामान्य जनास लागत नाही. परंतु, समर्थांसारखे ब्रह्मज्ञानी पुरुषांना मात्र भूत, वर्तमान आणि भविष्य कळते. त्यामुळे सामान्यांना ते त्यांच्या हातातील वर्तमानकाळ अधिक चांगला करावा असा उपदेश करतात. व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने वर्तमानकाळ हा सुवर्णमय काळ असतो. उत्तम व्यवस्थापन तेच की जे प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर प्रभुत्व प्राप्त करते.
केवळ एखाद्या औद्योगिक संस्थेत दुश्चित्तपणा आणि आळशी लोक बघायला मिळतात असे नव्हे तर समाजाच्या प्रत्येक स्तरावर असे पुष्कळ लोक असतात. कुटुंबातसुद्धा काही सदस्य हे खूप कष्टाळू, प्रामाणिक आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारे असतात तर काही मात्र आळशी, कामचुकार आणि निष्काळजी असतात. ज्या कुटुंबात ज्या प्रवृत्तीचे लोक अधिक असतात त्या कुटुंबाचे भविष्य हे त्यांच्या वृत्तीनुसार ठरत असते. म्हणूनच आपल्यातील अवगुण जितक्मया लवकर शक्मय असेल तितक्मया लवकर सोडून देऊन सद्गुण अंगीकारावेत. यामुळे कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होतो.
पुढे श्रीसमर्थ म्हणतात की,
दुश्चित्त बैसलाची दिसे !
परी तो असतचि नसे !
चंचळ चक्री पडिले असे !
मानस तयाचें !!
सावध असोन उमजेना !
श्रवण असोन ऐकेना !
ज्ञान असोन कळेना !
सारासार विचार !! 25-27/ 06/ 08
दुश्चित्त माणूस एका ठिकाणी बसलेला दिसतो, पण तो तेथे असून नसल्यासारखा असतो. त्याचे मन एकाचवेळी अनेक विषयांमध्ये गुंतलेले असते. अशा मनुष्याचे लक्ष आहे असे वाटते पण तो लक्ष देत नाही, ऐकतो आहे असे वाटते पण त्याला ऐकलेले नीट कळत नाही, आणि ज्ञान आहे असे दिसते पण खरे काय आणि खोटे काय हे त्याला समजत नाही.
व्यवस्थापनशास्त्रात श्री समर्थांनी सांगितलेली दुश्चित्तपणाची मूर्ख लक्षणे ठिकठिकाणी आढळून येतात. एखाद्या कार्यालयात काही कर्मचारी हे त्यांच्या वरि÷ांनी सांगितलेली आज्ञा केवळ ऐकून घेतात पण त्यावर नीट अंमलबजावणी करत नाहीत. तसेच काही कर्मचारी हे काम करत आहेत असे वाटते पण त्यांचे कामात पूर्ण लक्ष नसते. त्यांना जे कार्य करायचे असते त्याचे नीट आकलन झालेले नसते. यामुळे अनेक समस्या उद्भवतात आणि संस्थेने जे ध्येय ठरवलेले असते ते मात्र पूर्णत्वास जात नाही. या अशा दुश्चित्तपणामुळेच कार्याचा नाश होतो, नेहमी काळजी लागते, कोणतीही गोष्ट नीट आठवत नाही, जीवन नकोसे होते, ते शत्रूसारखे ताप देते, मनाचा निश्चय होत नाही, कार्यात यश येत नाही आणि सगळय़ात शेवटी जे आत्महित आपल्यास साधायचे असते ते नीट साधले जात नाही. या सर्व गोष्टींचे पर्यवसान शेवटी अविद्येत होऊन अनेक कुकर्मे मनुष्याचा हातून घडतात.
आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे टिकवायचे असेल तर आपण आपल्यातील आळस आणि दुश्चित्तपणास कायमस्वरूपी तिलांजली देत तैलधारवत राष्ट्राची सेवा करणे आवश्यक आहे. हीच खरी राष्ट्रपुरुषांना, स्वातंत्र्ययोध्यांना आणि देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांना श्रद्धांजली ठरेल. वंदे मातरम!!!
माधव किल्लेदार