ऑनलाईन टीम / मुंबई :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्यांची बायको पळून जाते, त्यांचे नाव मोदी ठरतं असे वक्तव्य पटोले यांनी केले आहे.
यापूर्वी पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पटोले यांनी आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो, असे स्पष्टीकरण देत पोलिसांनी या गावगुंडाला अटक केल्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एकदा मोदींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत पटोले यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिले.
मी ज्या गावगुंड मोदी विषयी बोललो त्याचे भाजप एवढे समर्थन का करत आहे. भाजपची काय अवस्था झाली आहे, हे पाहून लोक हसत आहेत. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवलं जात आहे. असं असताना अजून काय राहिलं आहे. आम्हाला पंतप्रधानांविषयी आदर आहे. त्यामुळे भाजपने त्या गावगुंडाचे समर्थन करु नये. पुतळे जाळायचे असतील तर बेटी बचाओ बेटी पटाओ म्हणणाऱ्यांचे जाळा, असा निशाणाही पटोले यांनी साधला.