चिंतन, मनन, जतन आणि वर्तन ह्या चारही विचारांचा किंवा कृतींचा आपल्या वैयक्तिक जीवनावर जसा परिणाम होतो तसाच सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातही होत असतोच. याकरिताच श्रीसमर्थ म्हणतात की, प्रभाते मनी राम चिंतीत जावा! पुढे वैखरी राम आधी वदावा! राम हा केवळ दोन अक्षरांचा शब्द नव्हे तर अतिशय व्यापक अशी ही संकल्पना आहे. व्यवहारात आपण ‘रामबाण उपाय’ हा शब्दप्रयोग नेहमीच वापरत असतो. अनेकवेळा आपण एखाद्या कृतीत, घटनेत किंवा गोष्टीत राम नाही असेही म्हणत असतो. राम म्हणजेच सामर्थ्य होय. हे सामर्थ्य जो समर्थ आहे अशांनाच प्राप्त होते. म्हणूनच श्रीसमर्थांना आपण श्रीसमर्थ रामदासस्वामी असे म्हणतो. श्रीसमर्थ हे रामनाम जगलेत. समाजामध्ये स्वतःच्या सामर्थ्याने त्यांनी रामनाम वाढवले. समाजाचे अंतर्मन जाणून घेऊन त्यांनी समाजाला राममय केले म्हणूनच वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्यात प्रभू श्रीरामासारखे सामर्थ्य निर्माण झाले.
आपल्या देशावर जसे परकियांचे दुष्टचक्र आले तसेच सांस्कृतिक आक्रमणही झाले. पण आपण या दोन्ही आक्रमणांना आणि आक्रमकांना पचवून आजही अभेद्य आहोत. कारण आपल्याकडे असलेल्या राममय सामर्थ्याने आणि त्या सामर्थ्यातून आपण समर्थसंपन्न झालो आहोत. व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा जर सामर्थ्यवान व्हायचे असेल तर श्रीसमर्थांच्या दासबोध या रामबाण उपायाचा अवलंब करावा लागेल. अनेक संस्था, संघटना आणि चळवळी आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून उदयाला आल्या आहेत. त्यातील काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या किंवा लयाला गेल्या. पण त्यातील काहीच संस्था, संघटना आणि चळवळी टिकल्या, ज्यांचा हेतू शुद्ध होता.
औद्योगिक संस्थांच्या व्यवस्थापनशास्त्रात अनेकवेळा कर्मचारी आणि कामगारवर्गाच्या मागण्या, हक्क आणि अधिकार याविषयी बोलले जाते. पण ज्यांनी अशा प्रकारचे उद्योगसमूह निर्माण केले त्यांच्याविषयी जिव्हाळय़ाने किंवा आत्मीयतेने खूप कमी बोललेले किंवा लिहिलेले आढळते. अर्थात याला अपवाद असू शकतात. जो कुठलाही उद्योग समूह किंवा जी कुठलीही औद्योगिक संस्था निर्माण केली जाते, त्या निर्मितीच्या मुळाशी असलेला उद्देश जर शुद्ध आणि सात्विक असेल तर दीर्घ काळपर्यंत अशी संस्था अस्तित्वात राहते. पण जर निर्मितीचा पायाच अशुद्ध असेल तर मात्र अशा संस्था किंवा उद्योगसमूह हे खूप काळपर्यंत तग धरू शकत नाही. हेतू शुद्ध असण्याकरिता जो निर्माता आहे त्याचे चिंतन हे कुठल्या दिशेने होते आहे हे बघणे गरजेचे आहे. चिंतन जर सकारात्मक असेल तर पाया मजबूत होईल आणि चिंतन जर नकारात्मक असेल तर पाया कमकुवत होईल. चिंतन सकारात्मक होत असेल आणि मनन जरी नकारात्मक असले तरीही शुद्ध हेतू साध्य करता येऊ शकतो. कारण चिंतन आणि मनन या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. सकारात्मक चिंतन हे नकारात्मक मनन केले जात असेल तर त्यावर मात करून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून शुद्ध हेतूपर्यंत पोहोचू शकते. पण चिंतनच जर नकारात्मक रीतीने होत असेल तर मात्र मनन, जतन आणि वर्तन हे कितीही शुद्ध असले तरीही शुद्ध हेतू निर्माण होऊ शकत नाही. म्हणून संतश्रे÷ तुकाराम महाराज म्हणत की,
शुद्ध बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।
मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ।।
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।।
तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ।।
स्वामी विवेकानंद जसे म्हणतात की, ‘तुम्हाला चांगले व्हायचे असेल तर तुम्ही चांगले होऊ शकता आणि जर वाईट व्हायचे असेल तर वाईट होऊ शकता. निवड तुमची.’ त्याप्रमाणे उद्योग/व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपले हेतू नेहमी उद्योजकाने तपासून पहावेत. सतत स्वतःला पडताळून पहावे. स्वामी विवेकानंदांच्या आशीर्वादानेच जमशेदजी टाटा यांनी टाटा उद्योग समूहास सुरुवात केली. त्यांचा हेतू शुद्ध असल्याने आणि चिंतन हे सकारात्मक असल्याने आजही टाटा उद्योग समूह आपल्या देशातील नवउद्योजकांना प्रेरणास्रोत आहे. जमशेदजी टाटा, जे. आर.डी आणि रतन टाटा यांनी हीच सकारात्मक परंपरा सतत सुरू ठेवली आणि त्याची चांगली फळे आज भारतीय उद्योगविश्वाला चाखायला मिळत आहेत.
इतर उद्योगसमूहाला स्पर्धा निर्माण करण्यासाठी जर स्वतःचा उद्योग समूह सुरू केला जात असेल तर मात्र चिंतन हे नकारात्मक असून हेतू अशुद्ध आहे असेच समजावे. तसेच आपल्या उद्योग समूहाला स्पर्धा निर्माण केली जाते आहे म्हणून इतर उद्योग समूह बंद पडावे अशा रीतीने कृती केली जात असेल तरीही सुरुवातीला केले गेलेले चिंतन हे नकारात्मक होते आणि अशुद्ध हेतू होता हे मानावे. व्यवस्थापन शास्त्रातील अशा मानसिकतेविषयी श्रीसमर्थ म्हणातात की,
स्पर्धा खटपट आणि चटपट !
तऱहे झटपट आणि वटवट !
सदा खटपट आणि लटपट !
परम वेथा कुविद्या !! 07/03/02
म्हणजे, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, तऱहेवाईकपणा, काम उरकण्याची घाई, वटवट, तक्रार करण्याची सवय आणि उलटे-सुलटे करण्याचा स्वभाव म्हणजे कुविद्या.
चिंतनानंतर मनन केले जाते मग केलेल्या मननातून उत्तम विचारांचे जतन केले जाते आणि त्यानुसार वर्तन घडत असते. कुठल्याही उद्योग समूहाच्या संस्थापकास आपला उद्योग समूह लयाला जावा, आपल्या उद्योग समूहातील कर्मचारी, कामगार किंवा व्यवस्थापक यांना अडचणींचा सामना करावा लागावा असे कधीच वाटत नाही. पण अनेकदा गैरसमजुतीतून किंवा पूर्वग्रहदोषामुळे संस्थापकाच्या हेतूविषयी शंकेचे वातावरण निर्माण होत असते. कर्मचारी, कामगार किंवा व्यवस्थापक हे त्यांच्या संपूर्ण दिवसातील काहीच तास संबंधित उद्योग समूहास देत असतात. परंतु, जो संचालक किंवा संस्थापक आहे त्यास मात्र त्याचे संपूर्ण आयुष्य स्वतःच्या उद्योग समूहाकरिता वाहून घ्यावे लागते. कामगार कर्मचारी किंवा अधिकारी वर्गाला केवळ स्वतःच्या कुटुंबाचीच काळजी वाहावी लागते पण संस्थापकास मात्र अनेक कुटुंबे सांभाळावी लागतात. स्वतःच्या हक्कांविषयी, अधिकाराविषयी किंवा इतर मागण्यांविषयी जसे कामगार, कर्मचारी, अधिकारी वर्ग जागृत असतो तशीच जागृती संबंधित उद्योगसमूहाच्या संचालक आणि संस्थापक वर्गाविषयी असणे आवश्यक आहे. या अशा मानसिक अवस्थेविषयी श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात की,
जैसें जैसें करावे !
तैसें तैसें पावावे !
हें जयास नेणवे !
तो येक मूर्ख !! 41/01/02
म्हणजे, जसे करावे तसे भरावे हे ज्यास कळत नाही तो मूर्ख असतो. म्हणून आपल्या मराठी भाषेत म्हणतात की, ‘ज्याचे खावे मीठ त्याच्याशी वागावे नीट!’ ज्या कुठल्याही संबंधित उद्योगसमूहात आपण कार्यरत आहोत तेथील व्यवस्थापनाविषयी, संस्थापकांविषयी आणि संचालकांविषयी आपण सतत सकारात्मक राहणे अत्यावश्यक आहे. याचे परिणाम हे आपल्याला समर्थ बनवतात आणि आपली उद्योगसंस्थाही सामर्थ्यसंपन्न होण्यास हातभार लागतो.
– माधव किल्लेदार