ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविट ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
06 सप्टेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म झाला. झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. 150 हून अधिक मराठी नाटके, 200 पेक्षा जास्त चित्रपट यासह अनेक मालिकाही त्यांनी गाजवल्या. अलीकडेच ते ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारात होते. पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.
पटवर्धन हे मुंबईतील रिझर्व्ह बँकेतही नोकरीला होते. वयानुसार येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली होती.