ऑनलाईन टीम / चेन्नई :
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांची अखेर आज प्राणज्योत मालवली आहे.
यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी स्वतः ला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. ते आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणाले होते की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे, असे सांगितले होते.
दरम्यान, एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार असे म्हटले जाते. त्यांनी जवळपास 40 हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती.
त्यांनी तेलगू, मल्याळम, तमिळ, हिंदीसह 16 भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केले होते. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आले आहे.