प्रतिनिधी / सावंतवाडी:
येथील श्रमविहार कॉलनीतील रहिवासी, ज्येष्ठ लेखिका तथा सेवानिवृत्त शिक्षिका उषा विद्याधर भागवत (80) यांचे बुधवारी रायगड-नागोठणे येथे निधन झाले. त्यांच्यावर येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा रवी, मुलगी प्रा. वसुंधरा असा परिवार आहे. उषा भागवत या जिल्हय़ातील साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळीत सक्रिय होत्या. ज्येष्ठ साहित्यिक कै. विद्याधर भागवत यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्याबरोबरीने आणि पश्चातही त्यांनी साहित्य चळवळ पुढे चालविली होती.
उषा भागवत यांनी भेडशी सेंट्रल इंग्लिश स्कूल येथून शिक्षिका म्हणून सुरुवात केली. त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी (ईडीओ) म्हणून भेडशी परिसरात काम करताना 10 ते 20 किमी पायी प्रवास केला होता. त्यानंतर त्या लेखनाकडे वळल्या. त्यांनी बालसाहित्य लिहिले. त्यांनी ‘पुरश्चरण, बोगनवेल, वास्तुशांत, पालवी, मनोहर, ओंजळ’ आदी लेखन केले. भागवत यांना सांगली वाळवा येथील संस्थेचा, अटल प्रतिष्ठानचा अटल गौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मुंबई येथील पु. भा. भावे समितीचा प्रभावती भावे पुरस्कार लेखन आणि शैक्षणिक कार्याबद्दलही पुरस्कार मिळाला होता. आकाशवाणी रत्नागिरी येथे त्यांनी कथाकथनही केले होते.