चिपळूण साहित्य संमेलनाचे भूषवले होते अध्यक्षस्थान
प्रतिनिधी/ पुणे
ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय 74) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. कोत्तापल्ले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी दुपारी दोन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा, अशा विविध साहित्य प्रकारात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मुक्तपणे मुशाफिरी केली. डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 रोजी मुखेड (जि. नांदेड) येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी 1980 साली पीएचडी पदवी संपादन केली.
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (1988-1989), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे 1999 साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
चिपळूण संमेलनात अध्यक्षपदाचा मान
चिपळूण येथे 2012 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण प्रचंड गाजले. साहित्य संमेलनात धार्मिक प्रतीके असता कामा नयेत, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली होती. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचेही ते अध्यक्ष होते.