@ पुणे / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. दत्ताराम मारुती मिरासदार तथा द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सायंकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मिरासदार यांनी परळी वैजनाथ येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविले होते. कथा आणि साहित्य क्षेत्रातील अव्वल लिखाणामुळे त्यांचा राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला होता.
मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर जिल्हय़ातील अकलूज येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. पुण्याच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध भूमिकांतून काही वर्षे काम केल्यानंतर ते अध्यापन क्षेत्राकडे वळले. इ. स. 1952 साली अध्यापन क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. तसेच 1961 ते 1987 या काळात ते देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 1950 मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या पहिल्याच कथेपासून त्यांच्या लेखन कारकिर्दीला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यांच्या अनेक कथा सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समीक्षकांच्याही पसंतीची दाद मिळवून गेल्या.
मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. त्यांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी 1962 सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळय़ा भागात कथाकथन करीत असे. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली. द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाटय़ अनुभवायला मिळे. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही कोलकात्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून झाले. त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा-अमेरिकेतल्या 23 गावांतून 25 कार्यक्रम करायचा विक्रमही केला. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत.
मिरासदारांच्या कथाकथनाला ‘हास्यकल्लोळा’ची झालर
द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि वाई प्राज्ञपाठशाळेच्या सरस्वती उत्सवामध्ये अनेकदा झाले आहेत. पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 83 वर्षांच्या द. मा. मिरासदारांनी ‘भुताची गोष्ट’ ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला. आवाजातला नाटय़मय चढउतार, छोटय़ा-छोटय़ा प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रे श्रोत्यांच्या डोळय़ांसमोर उभी करण्याची त्यांची क्षमता 83 व्या वषीही अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
चित्रपट सृष्टीतही लक्षणीय ठसा
साहित्याच्या क्षेत्राप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या लेखणीचा मुक्त संचार लक्षणीय ठरला. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून ‘गुरुकृपा’ हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. पुणे शहरात त्यांच्या नावाचे ‘द. मा. मिरासदार प्रति÷ान’ आहे.