वार्ताहर/ येडूर
प्रत्येक शेतकऱयांनी आपल्या शेतात किमान पाच झाडे लावून त्याची निगा राखावी. या उपक्रमामुळे झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचा होणारा ऱहास थांबण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून मानवाचे आरोग्यही व्यवस्थित ठेवण्यास प्रयत्न करावा, असे आवाहन श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
श्रीक्षेत्र येडूर (ता. चिकोडी) येथे वीरभद्रेश्वर विशाळी यात्रा महोत्सव, महारथोत्सव आणि बिल्वार्चन रुद्राक्षार्चन कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ते दिव्य सानिध्यावरुन बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी तर उद्घाटक म्हणून सौंदत्तीrचे आमदार आनंद मामनी उपस्थित होते. आमदार मामनी व स्वामीजींच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी काडसिद्धेश्वर संस्थान मठातर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा गुरुकुल भास्कर पुरस्कार देशीकेंद्र शिवयोगीश्वर स्वामीजींना श्रीशैल जगद्गुरुंच्या हस्ते देण्यात आला.
मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड
यावेळी श्रीशैल स्वामीजी पुढे म्हणाले, वृक्षारोपण काळाची गरज असताना मानव त्यापासून दूर जात आहे. वृक्षाला देव मानतात असे असताना मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पण तोडलेल्या वृक्षाच्या तुलनेत वृक्षारोपण मात्र फार कमी प्रमाणात होत आहे. भारतीय सणामध्ये वृक्षाला फार मोठे महत्व आहे. झाडांची पाने हा सणातील मुख्य घटक आहे. एका मुलाला जन्म देणे व एका झाडाला जगवणे समान प्रक्रिया आहे. पर्यावरणासाठी प्रत्येकांनी झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
येडूर देवस्थानाबरोबरच गावाचाही विकास
आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, श्रीक्षेत्र येडूर येथील जगद्गुरुंनी बारा वर्षांपूर्वी येथील सुत्रे स्वीकारल्यापासून येडूर देवस्थानाबरोबरच गावाचाही विकास केला आहे. या विकासामुळे येडूर दुसरी काशी बनत आहे. याभागात आलेल्या महापुरात महास्वामीजींनी निवारा केंद्र सुरू करुन पूरग्रस्तांना आश्रय दिला, असे सांगितले. यावेळी शेखर इनामदार, महादेव शिवाचार्य स्वामीजी, वीरभद्रेश्वर शिवाचार्य स्वामीजी, अभिनव मृत्युंजय स्वामीजी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष शेखर इनामदार, पीएसआय रमेश बोरगावे, केएसएस परीक्षा उत्तीर्ण झालेली श्वेता बिडीकर, रविंद्र पाटील, विश्वेश्वर भदरगडे, अमित तारदाळे, सचिन चिरपे, मल्लप्पा अरळीमट्टी, दयानंद जनमट्टी यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष अजितराव देसाई, श्रीकांत उमराणे, मल्लय्या जडे, श्रीशैल शास्त्राr यांच्यासह भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.