माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांना वाहिली श्रद्धांजली
वृत्तसंस्था / रांची
झारखंड सरकारमधील पर्यटन आणि क्रीडामंत्री हफीजुल हसन अंसारी यांनी एम्समध्ये उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना जिवंतपणीच श्रद्धांजली वाहिली आहे. हसन यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचे म्हणत मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली आहे. अंसारी यांच्या या कृत्यावर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली आहे.
पूर्ण देश माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहे. रुग्णालय व्यवस्थापनानुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीत असलेल्या झारखंड सरकारचे मंत्रीच मनमोहन यांचे निधन झाल्याचे म्हणत शोक व्यक्त करत आहेत. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांसह खासदार दीपक प्रकाश तसेच अन्य नेत्यांनी या अशोभनीय विधानावर मंत्री हफीजुल हसन अंसारी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मंत्री हफीजुल यांनी एका सभेला संबोधित करताना एक दुःखद बातमी असून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचे म्हटले होते. मंत्र्याचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांना ट्रोल केले जातेय.