रांची / वृत्तसंस्था
नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’दरम्यान शुक्रवारी रात्री झारखंडमध्ये लातेहार जवळील रेल्वेमार्ग उखडून टाकण्यात आला. झारखंडमधील लातेहार आणि टोरी रेल्वे स्थानकादरम्यानचा रेल्वेरुळ नक्षलवाद्यांनी उखडला आहे. यासह चाईबासा येथेही नक्षलवाद्यांनी रेल्वेमार्ग उखडण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसत होती.
कुख्यात नक्षलवादी आणि एक कोटींचे इनाम असणाऱया प्रशांत बोस आणि त्याची पत्नी शिला मरांडी यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंदची हाक दिली होती. या बंदमुळे झारखंडमधील पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले हेते. तसेच जवानांना अलर्ट जारी करताना कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे असे आदेश वरि÷ांकडून देण्यात आले होते.
प्रशांत बोस उर्फ किशन दा उर्फ मनीष उर्फ ‘बुढा’ हा कुख्यात नक्षलवादी आहे. झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि महाराष्ट्र या राज्यातील संघटनांचा तो प्रमुख आहे. तसेच तो झारखंड आणि बिहारमधील नक्षलवाद्यांचा मुख्य कमांडर आहे. 100 हून अधिक नक्षली कारवायांमध्ये त्याचा हात आहे. त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. प्रशांत बोस याची पत्नीही नक्षली कारवायांमध्ये सक्रिय आहे. पोलिसांनी त्याला आणि त्याची पत्नी शिला मरांडी हिला 12 नोव्हेंबरला अटक केल्यानंतर नक्षलवादी बिथरले आहेत.