नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेदरम्यान लस वाया करण्यामध्ये झारखंड राज्याचे नाव आघाडीवर आहे. देशात झारखंडमध्ये सर्वाधिक लस वाया गेल्या असून छत्तीसगडचा दुसरा क्रमांक आहे. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या आकडेवारीवर असहमती दर्शवत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, लसीकरण मोहिमेच्या बाबतीत केरळ राज्याने योग्यपणे परिस्थिती हाताळल्याची स्पष्टोक्तीही देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केरळ सरकारचे आणि तेथील आरोग्य कर्मचाऱयांचे कौतुकही केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये 37.3 टक्के लसी वाया गेल्या आहेत, त्यानंतर छत्तिसगडमध्ये 30.2, तामिळनाडूमध्ये 15.5, जम्मू काश्मीरमध्ये 10.8 तर मध्यप्रदेशमध्ये 10.7 टक्के लसी वाया गेल्या आहेत. संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असताना लसी वाया घालवणे उचित नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच जास्तीत जास्त एक टक्का लस वाया जावी असे राज्यांनी उद्दिष्ट ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्यांना त्यांची लोकसंख्या आणि गरजेनुसार लस दिल्या जातात, तेव्हा किती लस वाया गेल्या याची माहिती ठेवणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.