ऑनलाईन टीम / रांची :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यात आता झारखंड सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि मास्क न घालणाऱ्यांना एक लाख रुपयांचा दंड आणि दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
झारखंड कॅबिनेटने गुरुवारी ‘संक्रमण रोग अध्यादेश 2020’ मंजूर केला. यामध्ये सांगितले आहे की, राज्यात जे कोणी नियमांचे उल्लंघन करतील तसेच मास्क न घातल्यास एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल.
यासोबतच अध्यादेशात सांगितले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला दोन वर्ष तुरुंगात राहावे लागेल. परंतु अजूनही राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थांबवण्यास कोणतेही चेकिंग होताना दिसत नाही आहे. राजधानी रांचीमध्ये तर लोकं मास्क न घालता फिरताना दिसत आहेत.
दरम्यान, प्रवासी मजूर येण्याने आणि लोकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने झारखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. सध्या झारखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 6458 इतकी आहे. तर 64 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 3024 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 3397 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.