अखिलेश यांचे गुंड बुंदेलखंडमध्ये तयार करायचे कट्टा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झाशीच्या बरुआसागरमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना अखिलेश यांचे गुंड बुंदलेखंडमध्ये कट्टा तयार करायचे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिफेन्स कॉरिडॉरद्वारे क्षेपणास्त्र निर्मितीचे काम केल्याचे उद्गार काढले आहेत. बुंदेलखंडमध्ये निर्माण होणारे क्षेपणास्त्र आता पाकिस्तानला धडा शिकविणार असल्याचे ते म्हणाले.
शाह यांनी सभेत बोलताना अखिलेश यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यात अखिलेश यादव यांचे सरकार असताना बुंदेलखंडमध्ये 3 हजार लोक उपासमारीमुळे मृत्युमुखी पडले, तर 300 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. सप सरकारमध्ये गुंड उघडपणे जमिनीवर कब्जा करत होते. अखिलेश यादव यांनी 5 वर्षांमध्ये स्वतःच्या कुटुंबाच्या 45 सदस्यांना विविध पदांवर बसविण्याचे काम केले. तर पंतप्रधान मोदींनी 45 योजना लोकांच्या घरी पोहोचविण्याचे काम केले आहे. 15 वर्षांपर्यंत आत्या-भाच्याचे सरकार उत्तरप्रदेशला लुटत राहिल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
इस्रायलच्या तंत्रज्ञानाद्वारे बुंदेलखंडची पेयजल समस्या दूर करण्याचे काम केले जात आहे. बुंदेलखंडसाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प केन-बेतवा नदीजोड प्रकल्प आहे. यात 44,000 कोटी रुपये खर्च होणार असून 9 लाख हेक्टर भूमी सिंचनाखाली येणार असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.