प्रतिनिधी /वास्को
झुआरीनगरातील नागरीकांनी बुधवारी दुपारी पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ महामार्ग रोखून धरला. सुमारे दीड तास शेकडो नागरीकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची अडचण झाली. शेवटी पाणी पुरवठा अधिकाऱयांनी घटनास्थळी हजर होऊन लोकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. या लोकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार मांडली आहे.
झुआरीनगर, उपासनगर तसेच झुआरीनगरातील झोपडपट्टी व तेथील इतर भागांना मागच्या पाच सहा माहिन्यांपासूनच सुरळीत पाणी पुरवठय़ाची समस्या भेडसावण्यास सुरवात झाली होती. ही समस्या हळुहळु गंभीर बनत गेली. मागच्या पंधरा दिवसांपासून तर या भागांना पाणी पुरवठा जवळपास खंडीतच झाला. त्यामुळे स्थानिक लोक संतप्त झाले होते. पाण्याची मागणी धसास लावण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने शेकडो संतप्त नागरिकांनी बुधवारी बाराच्या सुमारास झुआरीनगरातील महामार्गावरच टिय्या मांडला. त्यामुळे झुआरीनगर भागात सुमारे दीड तास गोंधळ उडाला. झुआरीनगरातील बिर्ला, झोपडपट्टी भागातून जाणारा हा जुना रस्ता अडवल्याने बरीच वाहतुक चौपदरी महामार्गाकडे वळली. परंतु ज्यांना याच जुन्या महामार्गाचा वापर करणे आवश्यक आहे, त्यांची धांदल उडाली. या मार्गावरच सांकवाळ औद्योगिक वसाहत तसेच दाट लोकवस्ती असल्याने या जुन्या महामार्गावरही मोठय़ा प्रमाणात वाहतुक असते. लोकांच्या आक्रमक भुमिकेमुळे ही वाहतुक दीड तास रोखली गेली. महिला पुरूष मुले अशा सर्वच वयोगटातील लोक रस्त्यावर उतरले होते. काही महिलांनी पाण्याच्या घागरीही हाती घेतल्या होत्या.
राजकारणी नको, शासकीय अधिकारीच घटनास्थळी हजर करा
या घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी किंवा शासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन पाण्याची समस्या सोडवत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नसल्याचे या लोकांनी ठणकावल्याने पोलीसही हतबल झाले. आम्हाला या ठिकाणी राजकारणी नको आहेत केवळ अधिकाऱयांनीच या ठिकाणी यावे असा हेका या लोकांनी धरला. त्यामुळे लोकांना समजावून रस्ता मोकळा करण्यासाठी शासकीय अधिकाऱयांचीच प्रतिक्षा पोलिसांना करावी लागली. शेवटी वास्कोतील पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंते नरेश पैंगिणकर आपल्या इतर अधिकाऱयांसमवेत घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लोकांशी चर्चा केली. एका दिवसाआड रोज रात्री पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी लोकांना दिले. त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त करून रस्ता मोकळा केला.
झुआरीनगराला पाणी का नाही, लोकांचा सवाल
रस्त्यावर उतरलेल्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या पंधरा दिवसांपासून पाण्याची समस्या गंभीर बनलेली आहे. परंतु आतापर्यंत कोणीही त्यांच्या समस्येची दखल घेतली नाही. त्यामुळेच रस्त्यावर उतरावे लागले आहे. वास्को, मुरगाव, दाबोळी असे सगळीकडे पाणी मिळते. ही जलवाहिनी झुआरीनगरातूनच त्यांच्यापर्यंत जाते. मग झुआरीनगरातीलच लोकांना पाणी का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीचे दिवस असल्याने पाण्याचा टँकर उपलब्ध करण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीनंतर टँकर बंद होण्याची भिती आहे. त्यामुळे टँकरव्दारे पाणी पुरवठा आम्हाला नको, आम्हाला पाणी पुरवठाच सुरळीत झालेला हवा आहे अशी मागणी लोकांनी केली.
साळावलीतील तांत्रीक अडचणींमुळे पाणी पुरवठय़ावर परीणाम
दरम्यान, साळावलीतील काही तांत्रीक अडचणींमुळे पाणी पुरवठय़ाची समस्या असल्याचे मान्य करून सहाय्यक अभियंते नरेश पैंगिणकर यांनी झुआरीनगरातील लोकांना एका दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु मागच्या पंधरा दिवसांपासून त्यातल्या त्यात काही कुटुंबांना हे पाणी मिळत नव्हते असे दिसून आलेले आहे. त्यामुळेच लोक रस्त्यावर उतरले. त्यांची समस्या दूर करण्यात येईल असे स्पष्ट करून जोपर्यंत साळावलीतील समस्या दूर होत नाही तोपर्यंत पाण्याचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होईल असे पैंगिणकर म्हणाले.