केरळचे तिघे जागीच ठार, दोघे गंभीर, कारची कठडय़ाला धडक,
प्रतिनिधी /वास्को
झुआरीनगर वास्कोतील चौपदरी महामार्गावर गुरूवारी रात्री झालेल्या भिषण रस्ता अपघातात कारमधील तिघे युवक जागीच ठार झाले. त्यांच्यापैकी दोघे युवक गंभीर जखमी असून त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मृतांपैकी दोघे भाऊ आहेत तर अन्य जण त्यांचे मित्र असून ते सर्वजण केरळ राज्यातील आहेत. मयत युवकांची नावे कान्नन(24), विष्णू (27) व निधीन दास (24) अशी आहेत तर अखिल आणि विनोदकुमार हे जखमी आहेत.
चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील एमईएस कॉलेज नाक्याजवळून काही अंतरावरच गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला. मुळ केरळ राज्यातील असलेले कान्नन, विष्णू, निधीन दास, अखिल व विनोदकुमार हे पाच युवक रिटज् मारूती कारमधून वेर्णाहून दाबोळी विमानतळाच्या दिशेने जात होते. एमईएस कॉलेज नाक्यापासून काही अंतरावर चालकाचा वाहनावरील ताबा गेला आणि त्याने रस्त्यावरील कठढय़ाला धडक दिली. या धडकेने कार उलटून कारचा चुराडा झाला. त्या कारमध्ये चिरडून तिघे युवक जागीच ठार झाले. तर दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत बचावले. या भिषण अपघाताची माहिती मिळताच तेथील काही लोकांनी अपघात स्थळी धाव घेऊन रूग्ण वाहिकेला पाचारण केले व त्या युवकांना चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. कारमध्ये चिरडलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्नीशामक दलाची मदत घ्यावी लागली. गंभीर जखमी अवस्थेतील युवकांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वेर्णा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मृतांपैकी कान्नन व विष्णू हे दोघेही बंधू
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात दुर्दैवी अंत झालेले पाचही युवक केरळ राज्यातील आरात्तूपुज्हा कयामकुलम येथील असून विष्णू हा वास्कोत नौदलाच्या सेवेत होता. तर निधीन दास हा दाबोळी विमानतळावर सेवा बजावत होता. तर अन्य तिघे जण नववर्षांच्या स्वागतानिमित्त गोव्यात आले होते. अखिल हा कार चालवत होता. मयत कान्नन व विष्णू हे दोघे बंधु आहेत तर अन्य तिघे जण त्यांचेच मित्र होते.