रामदास आठवले यांचा राज ठाकरे यांना टोला
पुणे / प्रतिनिधी :
मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांना दिला.
आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाहीत. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे. भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा. आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातले तीन पक्षाचे सरकार किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राहायचे, हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावे लागणार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्याच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आठवले यांनी विरोध केला. आंबेडकर स्मारकाचे पैसे रुग्णालयाला देण्यास आमचा विरोध आहे. रुग्णालयासाठी सरकारने निधी द्यावा. ते बंद पडता कामा नये, पण इंदू मिलमधील स्मारकही पूर्ण झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.