दिव्यांगाना तीन चाकी स्कूटरचे अनुदान दिले नसल्यावरुन शिवाजी सर्वगौड यांनी उपस्थित केला मुद्दा
प्रतिनिधी /सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. सभापती निवास परिसरातील स्वच्छता केली जात नाही. लाखो रुपयांचा निधी नुसत्या स्वच्छतेवर खर्च केला जातो. परंतु प्रत्यक्षात तशी स्वच्छताच होताना दिसत नाही. हे टेंडर नेमके कोणी घेतले आहे. ते बदलणार केव्हा?, काम होत नसले तर ठेकेदार बदला अशी मागणी दीपक पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत केली. तसेच दीव्यांगाना दिलेल्या स्कुटर योजनेचे अनुदान दोन महिने खात्यावर वर्ग केले नाही. लाभार्थ्यांनी हात उसने पैसे घेतले होते, त्यांचे हप्ते कसे फेडणार असा मुद्दा शिवाजी सर्वगौड यांनी मांडला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलसंधारण व स्थायीची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत केवळ अर्चना देशमुख यांनी जलजीवन योजना राबवताना गाव पातळीवर खूप अडचणी येत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्या गावातल्या नागरिकांशी समन्वय साधताना दिसत नाहीत. त्यामुळे आधारलिंक करण्याची जी सक्ती करण्यात येते त्याबाबत अजून ही गैरसमज आहेत. त्यामुळे प्राधिकरणाकडून ही योजना राबवताना सम्वय राखले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
स्वच्छतेच्या ठेक्यावरुन दीपक पवार गरजले
सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारती व जिल्हा परिषदेच्या सभापती निवासाच्या स्वच्छतेकरता लाखो रुपये दरवर्षी खर्च केले जातात. जिल्हा परिषद जेवढे पैसे खर्च करते त्या प्रमाणात स्वच्छता तरी असते का?, जिल्हा परिषदेच्या परिसरातील काही ठिकाणी अस्वच्छता पहायला मिळते. याचे टेंडर कोणाकडे आहे ते जर काम करणार नसतील तर ते बदलण्यात यावे, अशी मागणी दीपक पवार यांनी केली.
दिव्यांगाच्या योजनावरुन गरजले शिवाजी सर्वगौड
दिव्यांगांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाच्यावतीने विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या योजनांमध्ये तीन चाकी स्कूटरचा लाभ देण्याकरता प्रस्ताव घेतले गेले. त्यांची मंजूरी दिली परंतु अजूनही त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले नाही. दिव्यांगांनी कर्ज काढुन, हातउसने घेवून, कोणी हप्त्याने ती स्कूटर खरेदी केली आहे. गेली दोन महिने झाले त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. जर पैसेच त्यांना द्यायचे नसतील तर प्रस्ताव मागवले कशाला? ज्या अधिकाऱयांमुळे हे झाले आहे त्याने हे हप्ते भरावेत, अशी मागणी शिवाजी सर्वगौड यांनी करताच सीईओ विनय गौडा यांनी लगेच ज्या गटविकास अधिकाऱयांनी अनुदान दिले नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.
महावितरण कंपनीच्या गाव पातळीवरील पोललाही कर आकारणी करा
महावितरण कंपनीकडून गेल्या काही महिन्यापासून ग्रामपंचायतींना वीज बिलाची मागणी केली जात आहे. वीज तोडणी केली जात आहे. त्यांनी मात्र ग्रामपंचायतींच्या जागेत पोल उभे करायचे. ट्रान्स्फार्मर उभे करायचे. व्यवसाय करायचा ते त्यांना चालते. त्यांनाही त्या जागेचा कर ग्रामपंचायतींचा भरला गेला पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील यांनी करत घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना म्हाडाकडून वेळेवर अनुदान दिले जात नाही. त्यामुळे व्याज वाढते हे व्याज शासनाने भरावे असाही मुद्दा त्यांनी मांडला.
बदली झालेल्या अधिकाऱयांचा आणि नव्याने आलेल्या अधिकाऱयांचा सत्कार
सातारा जिल्हा परिषदेत बदली झालेले अधिकारी आणि नव्याने बदलून आलेले अधिकारी अशा सर्वच अधिकाऱयांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने होण्यात आलेल्या या कौतुकामुळे अनेक अधिकाऱयांचा उर भरुन आला. तर काही अधिकाऱयांनी सातारा जिह्यात काम करायला मिळते हे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.