प्रतिनिधी/सांगली
जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यावरून सत्ताधारी भाजप मध्येच दोन गट पडल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. इच्छुक गटाकडून अविश्वास ठराव आणण्यासाठी सदस्यांच्या सह्या घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र तडसर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ऍड. शांता कनुंजे यांच्यासह काही सदस्यांनी फसवणूक करून सह्या घेतल्या जात असून आपण अविश्वास ठरावाच्या विरोधात असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे. भाजपामध्येच गटबाजी उफाळून आल्याने अध्यक्षांवर अविश्वास ठरावाच्या हालचालीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. सव्वा वर्षांनी खांदेपालट करण्यात येईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. मात्र विद्यमान पदाधिकाऱयांचा कालावधी संपला तरीही नेत्यांनी पदाधिकारी बदलाबाबत ठोस भूमिका घेतली नाही. पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या डझनभर सदस्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, माजी आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे यांच्यासह भाजप नेत्यांकडे पदाधिकारी बदलाबाबत वेळोवेळी मागणी केली. परंतु नेत्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सध्यातरी पदाधिकारी बदलाबाबत चर्चाही नाही. त्यामुळे इच्छुक सदस्य नाराज आहेत. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कालावधी सहा महिने शिल्लक राहिला आहे त्यामुळे बदल न झाल्यास भविष्यात संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. या कारणांमुळे इच्छुकांची घालमेल सुरू आहे. याला वाचा फोडण्यासाठी सदस्याने अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, त्यासाठी सदस्यांच्या सह्या घेण्यात येत आहेत.
मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या कट्टर समर्थक व तडसर जि. प. गटातून निवडून आलेल्या ऍड शांता कनुंजे यांनी अध्यक्षावरील अविश्वास ठराव दाखल करण्यास विरोध केला आहे. जिल्हा परिषद सदस्या यांचे पती डॉ अनिल कोरबु यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन द्यायचे आहे असे सांगून आपली सही घेतली असून परंतु त्यांच्याकडून माझ्या सहीचा अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बेकायदेशीरपणे वापर करीत असल्याचे मला समजले मी अविश्वास ठरावाच्या विरोधात आहे माझी सही ग्राहय धरू नये, असे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सदस्य कणूंजे यांच्याप्रमाणेच आणखी काही भाजपच्या सदस्यांनी अशा प्रकारे फसवणूक करून अशा प्रकारे फसवणूक करून सह्या घेतल्या चर्चा सुरू आहे. अविश्वास ठराव आणण्याच्या विषयावरून भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली असल्याने नेते पदाधिकारी बदलाबाबत कोणता मार्ग काढणार याकडे लक्ष लागले आहे.
45 चा आकडा कसा गाठणार?
जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यावरून भाजपमधील मतभेद उघड झाले. असून ठराव दाखल करण्यासाठी वीस सदस्यांच्या सह्यांची गरज आहे तर प्रत्यक्ष अविश्वास ठराव मंजुरीसाठी पंचेचाळीस सदस्यांची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच भाजपाच्या काही सदस्यांचा विरोध आहे. त्यामुळे अविश्वास ठराव साठी लागणारा 45 आकडा कसा काय करणार हा खरा प्रश्न आहे अशा परिस्थितीत अध्यक्षा वरील ठराव नामंजूर होण्याचीच अधिक शक्यता असून पदाधिकारी बदलाच्या हालचाली पुन्हा एखदा बारगळण्याची शक्यता आहे.