प्रतिनिधी/सातारा
निसर्ग जपला पाहिजे, झाड लावली पाहिजे. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणाला तिकीट हवं असल्यास 10 झाडं लावावीत. तुम्हाला जमत नसेल तर इकडे रोप द्या, आम्ही झाडं लावतो. झाड लावण्यात ग्लॅमर असलं पाहिजे असे वक्तव्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे केले. त्यांनी झाडे लावण्याचा हा फतवा काढला आहे. त्याचीच जिह्यात जोरदार चर्चा सुरू होती.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने फलटण येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सातारा वनविभाग, मुधोजी विद्यालय फलटण, आम्ही निसर्ग सोबती या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फलटण तालुक्यातील जावली येथे 15 लाख झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी रामराजे म्हणाले, आज आपण ग्लोबल वॉर्मिंग पाहतो आहोत. अवेळी येणारा पाऊस, होणारी वादळे, भूकंप ही संकटे जागतिक ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहेत. यातून कोणीही वाचू शकत नाही. त्याकरिता प्रत्येकाने किमान दहा झाडे लावली पाहिजेत. मी वारंवार सांगतो. पाठीमागेही जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत बोललो होतो. झाडे लावली गेली पाहिजेत. वाढवली गेली पाहिजे. निवडणुकीत उभे राहणार यांनी झाडे लावून मगच उभे रहावे याकरिता नियम केला पाहिजे. किमान दहा झाडे लावण्याची सक्ती असली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भोंग्यावरूनही राज ठाकरेंना फटकाले
गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगा काढण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून राज्यभरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्याच अनुषंगाने आज रामराजे यांनी भोंगा काढण्याऐवजी झाडे लावा असा आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला असता तर पर्यावरण जपण्यासाठी अनमोल कार्य झाले असते, असाही टोला त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.