वार्ताहर/ सांबरा
कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजच्या हातावर राबून खाणाऱया नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे काही नागरिकांना पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. याची जाणीव ठेऊन कलखांब येथील राज मातोश्री दीप युथ फौंडेशनतर्फे कणबर्गी येथील झोपडपट्टीतील लोकांना आहारधान्याचे वितरण करण्यात आले.
समाजसेवक आणि नॉर्थ रोटरी क्लब ऑफ बेलगामचे सदस्य जगजितसिंग प्रेमसिंग बडगुजर यांनी महेंद्रसिंग पोतिवाल यांच्या स्मरणर्थ 50 किलो गहू, 50 किलो तांदूळ, 15 किलो साखर, 1 किलो चहा पावडर दिले. यांच्यासह अनेकांनी जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत आहेत. तसेच शिवाजी हिरोजी यांनीही आहारधान्य स्वरुपात मदत केली आहे. या कार्यासाठी अहोरात्रपणे राज मातोश्री दीप युथ फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष बलराम पाटील, नंदू हिरोजी, रमेश पाटील, रामा चौगुले, उमेश हिरोजी, यल्लाप्पा पाटील, भरमा पाटील, मल्लुकांत यल्लारी, महादेव बेळगावकर हे सर्वजण विशेष प्रयत्न करत आहेत. यावेळी पोलीस ईश्वर कोलकार, बसवराज सिधींमर आदी उपस्थित होते. याआधीही फौंडेशनतर्फे 40 कुटुंबीयांना कोरोना काळात वाटप करण्यात आले आहे.