शांत आणि पुरेशा झोपेचं महत्त्व तज्ञमंडळी सातत्याने अधोरेखित करत आहेत. मात्र काम तसंच अन्य कारणांमुळे महिलांना पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे स्थूलपणा, मधुमेहासारख्या समस्या वाढीस लागत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातले शात्रज्ञ डॉ. मायकल मास्ले यांच्या म्हणण्यानुसार कोरोना महामारीनंतर ब्रिटन आणि अमेरिकेसहित संपूर्ण जगातच मधुमेहाची लागण होण्याची शक्यता असणार्या लोकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सात तासांपेक्षा कमी झोप घेणार्यांच्या शरीरातल्या साखरेचं प्रमाण तसंच स्थूलपणा वाढत असल्याचं समोर येत आहे. भारतातले तज्ञही याला दुजोरा देत आहेत.
अपुर्या झोपेमुळे हार्मोन्स असंतुलित होऊन चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतो, असं तज्ञ सांगत आहेत. लंडनमधल्या किंग्ज कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनानुसार निद्रानाशाच्या समस्येमुळे कॅलरींचं सेवन 30 टक्क्यांनी वाढतं. अपुर्या झोपेमुळे ताण येतो आणि तळकट, गोड पदार्थांचं सेवन करण्याकडे कल वाढत असल्याचंही या संशोधनातून समोर आलं आहे.
पुरेशी झोप घेतल्याने आपण अनेक आजारांना लांब ठेऊ शकतो. मधुमेह, स्थूलपणासह उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉल, हृदयविकारालाही लांब ठेवता येतं. यासोबतच उत्तम आरोग्यासाठी तुम्ही फायबर म्हणजेच तंतूमय पदार्थांनी युक्त आहार घ्या. कर्बोदकांचं प्रमाण कमी करून साखरेलाही दूर ठेवा. पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम आणि योगा करा. अशा पद्धतीने तुम्ही निरोगी राहू शकता.