प्रतिनिधी/ सातारा
आरटीओ कार्यालयालगत असणाऱया टपऱयांच्या अतिक्रमण पालिकेने हटवले. या ठिकाणी पुन्हा टपऱया न थाटण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या टपऱयांच्या जागेवर खड्डी-माती ढिग लागला आहे. येथील रस्त्याचे खड्डे मुजवण्याचे काम संबंधित विभागाने हाती घेतले होते. मात्र हे काम रखडल्याने यांचा नाहक त्रास वाहनाधारकांना होत आहे.
आरटीओ कार्यालय ते जिल्हा परिषद मैदान या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एक फुटाचे खड्डे पडले आहेत. या मार्गाने सतत वाहतूक होत असते. यामुळे काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. याच रस्त्यालगत टपऱयांचे अतिक्रमण झाले होते. चहा च्या टपऱयांच्या रांगा लागल्याने ग्राहकांची संख्या वाढली होती. हे ग्राहक आपली वाहने रस्त्यालगत उभी करत होती. यामुळे इतर वाहनधारकांना प्रवासादरम्यान अडथळा निर्माण व्हायचा. या वाढत्या अतिक्रमणाकडे सातारा नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने टपरीधारकांनी यांचा चांगलाच फायदा घेतला. याच पार्श्वभूमीवर या टपऱया हटवण्यात आल्या. पुन्हा येथे अतिक्रमण न करण्याचे आदेश ही देण्यात आले. याच रस्त्यालगत खड्डे मुजवण्यासाठी व डांबरीकरणाच्या कामासाठी खड्डी-माती चा ढिग लावण्यात आला. मात्र हे काम सुरूच झाले नाही. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. या कामाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने काम रखडले आहे. या मार्गाने येणाऱया वाहनधारकांना यांचा त्रास होत आहे. खड्डयामुळे किरकोळ अपघात होत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.