प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरबसल्या परसदारात किंवा बाल्कनीत भाजीपाला लावता यावा या उदात्त हेतूने कृतार्थ म्हार्दोळ या संस्थेचे राजेंद देसाई यांनी फोंडा परिसरातील साधारण 130 लोकांना विविध प्रकारच्या भाजीच्या बियांची पाकिटे घरपोच पाठविली होती. टपालातून पाठविण्यात आलेली साधारण 33 पाकिटे अद्याप नियोजित पत्त्यावर पोचली नसल्याने फोंडा टपाल कार्यालयाचा निष्काळजीपणा त्यातून उघडकीस आला आहे.
फोंडा शहर व शेजारील कुर्टी भागातील 39 लोकांच्या नावे देसाई यांनी भाजीच्या बियांची पाकिटे फोंडा टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पाठविली होती. त्यापैकी केवळ 6 पाकिटेच नियोजित पत्त्यावर पोचली आहेत. उर्वरित 33 पाकिटे गेली कुठे ? असा प्रश्न देसाई प्रश्न देसाई यांना पडला आहे. प्रत्येक टपालावर आपण पाच रुपये खर्च केले असून भाजीच्या बिया संकलन करून त्या पाकिटात भरण्यापासून त्यावर मजकूर छपाईपर्यंत पैसे व वेळही खर्च केलेला आहे. मात्र फोंडा टपाल कार्यालयाकडून ही पाकिटे गहाळ करुन आपल्या भावनांशी खिलवाड केल्याचा आरोप राजेंद्र देसाई यांनी केला आहे. लॉकडाऊनच्या काळात 16, 21 व 28 एप्रिल रोजी त्यांनी फोंडा शहरासह कुर्टी, केरी, सावईवेरे व प्रियोळ भागात भाजीच्या बियाण्यांची ही पाकिटे आपल्या हितचिंतकांना टपालातून पाठविली होती. म्हार्दोळ, केरी व सावईवेरे भागातील पोस्ट कचेऱयामधून सर्व पाकिटे नियोजित पत्त्यावर व वेळेत पोचली. मात्र फोंडा कार्यालयातून फोंडा शहर व कुर्टी पंचायत क्षेत्रातील पत्त्यावर पाठविलेली 39 पैकी 33 पाकिटे अद्याप पोचलेली नाही. राजेंद्र देसाई यांनी काल 6 मे रोजी त्यासंबंधी फोंडा टपाल कार्यालयात चौकशी केली असता, पोस्टाकडून अजब उत्तर मिळाले. त्यांना एक दोन पाकिटे दाखवित ती उदंरांनी फस्त केल्याचे कारण पोस्ट मास्तरने दिले आहे. गंगानगर कुर्टी भागात पाठविलेले एकही पाकिट पोचलेले नाही. यावरून पोस्ट खात्याच्या विश्वासहर्तेचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भारत सरकारची संदेश वहनातील सर्वात जुनी व विश्वसनीय सेवा म्हणून ओळखले जाणारे टपाल खाते अशा प्रकारे बेजबाबदार वागत असल्यास त्यांचे विश्वासहर्ता काय राहणार? असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला आहे.