विश्वभारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात मोदींचे संबोधन : ममता बॅनर्जी यांनी घेतला नाही भाग
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दृकश्राव्य यंत्रणेद्वारे संबोधित केले आहे. विश्वभारतीसाठी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे व्हिजन हेच आत्मनिर्भर भारताचे सार आहे. विश्वभारती विद्यापीठाला मोठे स्थान मिळवून देणाऱया प्रत्येकाला आदरपूर्वक नमन करतो, असे मोदी म्हणाले. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सोहळय़ात भाग घेतलेला नाही. भाजपसोबत सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
स्वातंत्र्यलढय़ाचा पाया खूप आधी रचण्यात आला होता. स्वातंत्र्यलढय़ाला पूर्वीपासून चालत आलेल्या अनेक आंदोलनांकडून ऊर्जा मिळाली. भक्तियुगात भारताच्या प्रत्येक क्षेत्रात संत, महंतांनी देशाच्या चेतनेसाठी अविरत प्रयत्न केले आहेत. वेदापासून विवेकानंदांपर्यंत भारताचा चिंतनप्रवाह गुरुदेवांच्या राष्ट्रवादाच्या चिंतनाही समाविष्ट होता आणि तो अंतर्मुख नव्हता. हा चिंतनप्रवाह भारताला अन्य देशांपासून वेगळा ठेवणारा नव्हता. भारतात जे सर्वशेष्ठ आहे, त्याचा जगाला लाभ व्हावा आणि जगातील चांगल्या गोष्टी भारताने शिकाव्यात असा टागोर यांचा दृष्टीकोन होता, असे विधान मोदींनी केले आहे.
विश्वकल्याणाचा मार्ग
विश्व भारतीसाठी गुरुदेव यांचे व्हिजन हेच आत्मनिर्भर भारताचेही सार आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमही जगाच्या कल्याणासाठी भारताच्या कल्याणाचा मार्ग आहे. ही मोहीम भारताला सशक्त करणारी असून भारताच्या समृद्धीतून जगात समृद्धी आणणारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
डाव्या खांद्यावर पदर
गुजरातची कन्या टागोर यांच्या घरात सून म्हणून आली होती. सत्येंद्रनाथ टागोर यांच्या (रविंद्रनाथ टागोर यांचे ज्येष्ठ बंधू) पत्नी ज्ञानदानंदिनी यांनी अहमदाबादमध्ये महिला साडीचा पदर उजव्या खांद्यावर ठेवत असल्याचे पाहिले होते. यामुळे काम करण्यास त्रास व्हायचा. तेव्हा त्यांनीच डाव्या खांद्यावर पदर ठेवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून ही परंपरा चालत आल्याचे मोदी म्हणाले.
1921 मध्ये स्थापना
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून 1921 मध्ये स्थापन विश्वभारती देशातील सर्वात जुने केंद्रीय विद्यापीठ आहे. मे 1951 मध्ये याला केंद्रीय विद्यापीठ तसेच इन्स्टीटय़ूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स घोषित करण्यात आले होते.