4 हजार जणांना मिळणार रोजगार – वाहन उद्योगाला होणार फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा ग्रुप येत्या काळामध्ये सेमिकंडक्टर निर्मितीचे तीन राज्यात कारखाने सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरच्या उद्योगामार्फत कंपनी 4 हजार जणांना नोकरी उपलब्ध करून देणार आहे.
कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सेमिकंडक्टर जोडणी व चाचणी संदर्भातला प्लांट टाटा ग्रुपकडून उभारला जाणार आहे. सदरील प्रकल्पासाठी संबंधित राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाच्या कार्यवाहीला जोर दिला जात असून त्यासंदर्भात चर्चाही केली जात असल्याचे टाटा ग्रुपने म्हटले. या प्रकल्पांच्या उभारणीनंतर चार हजार जणांना भरती करून घेतले जाणार आहे.
इतर कंपन्यांना होणार फायदा
सेमिकंडक्टर हा घटक वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचा असून सध्याला या भागाची टंचाई देशासह जगभरातच जाणवत आहे. या सेमिकंडक्टर निर्मितीचा फायदा वाहन उद्योगांना मोठय़ा प्रमाणात होऊ शकणार आहे. सध्याला जगभरातच सेमिकंडक्टर चिपची कमतरता भासत असल्याने ऑटो कंपन्यांना आपल्या वाहन उत्पादनामध्ये कपात करावी लागत आहे. सेमिकंडक्टरच्या वाढत्या मागणीमुळे वाहनांच्या किमतीही वाढल्याचे दिसून आले आहे. टाटा ग्रुप सेमिकंडक्टरची निर्मिती यशस्वीरित्या करू शकला तर याचा फायदा इतर वाहन कंपन्यांनाही होऊ शकणार आहे.