मुंबई
बांधकाम क्षेत्रात टाटा ग्रुपची टाटा रिऍल्टी ही कंपनी कार्यरत असून येणाऱया काळात कंपनी 4 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. रहिवासी, व्यावसायिक व रिटेल मालमत्तांमध्ये विविध प्रकल्प येणाऱया काळात साकारण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे. सध्याला तयार घरांना (रेडी-टू-मूव्ह-इन) मोठी मागणी आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत सदरची गुंतवणूक रहिवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांमध्ये समान पद्धतीने विभागून खर्चली जाणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात बांधकाम प्रकल्पांना वेग देण्यात आला असून या काळात कंपनीने 1500 बांधकाम कामगारांना भरती करून घेतले असून एकूण कामगारांची संख्या 5 हजार झाली असल्याची माहिती टाटा ग्रुपकडून देण्यात आली आहे. 2020-21 वर्षात कंपनीने 1500 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. अपेक्षेपेक्षा 120 टक्के जास्त महसूल प्राप्त झाल्याने कंपनी सध्या फॉर्मात असून याच क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित केले जात असून याकरीताच अधिकची गुंतवणूक केली जात आहे.