30 लाख रुपये रोकड, पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त, विशेष पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 15 वर्षांपूर्वी बेळगाव, बागलकोट, विजापूरसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात दहशत माजविणारी टायगर गँग पुन्हा सक्रिय झाली आहे. या गँगमधील 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ‘कोका’ (कर्नाटक संघटित गुन्हे नियंत्रण कायदा-2000) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बुधवारी ही माहिती दिली.
रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक शंकरगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. गेल्या 12 वर्षांपूर्वी खून, खुनी हल्ला, दरोडा, खंडणी वसुली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही जणांचा यामध्ये समावेश आहे. या टोळीकडून मोठय़ा प्रमाणात रोकड, शस्त्रs, मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, पोलीस उपअधीक्षक शंकरगौडा पाटील, गोकाकचे मंडल पोलीस निरीक्षक गोपाल राठोड आदींच्या उपस्थितीत बुधवारी गोकाक येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांना जप्त मुद्देमाल दाखविण्यात आले. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे.
9 जणांच्या या टोळीला अटक करून कोका खाली त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी एकूण 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात 30 लाख 48 हजार 460 रुपये रोकड, एक पिस्तूल, 20 जिवंत काडतुसे, चार तलवारी, तीन जांबिया, 22 मोबाईल संच, चार सीमकार्ड, 11 पासबुक, वेगवेगळय़ा मालमत्तांसंबंधीची 12 कागदपत्रे, एक पॅनकार्ड, एक आधारकार्ड, एक मतदार ओळखपत्र, 4 कोरे धनादेश, दोन एटीएम कार्ड, बॉन्ड पेपर जप्त करण्यात आले आहेत.
2006 मध्ये टायगर गँग अस्तित्वात आली होती. खुनी हल्ला, खून, दरोडे आदी गुन्हय़ांमध्ये हे गुन्हेगार सक्रिय होते. बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्हय़ात गुन्हे केल्याच्या आरोपावरून 2008 मध्ये पोलिसांनी या टोळीच्या मुसक्मया आवळल्या होत्या. त्यानंतर काही वर्षे ही टोळी थंड होती. आता पुन्हा सक्रिय झाल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.
पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 6 मे रोजी रात्री सिद्धाप्पा अर्जुन कनमड्डी (वय 31) याचा खून करण्यात आला होता. रोहित पाटील (वय 23, रा. गोकाक) या तरुणाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सिद्धाप्पा या दलित नेत्याचा खून करण्यात आला होता. त्याचवेळी रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक शंकरगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ तपास
या पथकातील अधिकाऱयांनी तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ तपास करून टायगर गँगची पाळेमुळे खणून काढली आहेत. गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या सर्व 9 जणांवर कोका कायदा लागू केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत, याची सखोल माहिती मिळविण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.
चौकट करणे
13 ठिकाणी छापे, 9 जणांना अटक
यासंबंधी 13 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. गोकाकमधील 9 तरुणांना अटक करण्यात आली असून ते सर्व जण 20 ते 45 वयोगटातील आहेत. गंगाधर संत्राम शिंदे (वय 26), विनायक बसवराज हडगीनाळ (वय 22), विठ्ठल परशराम पवार (वय 23), विनोद चंद्रू होसमनी (वय 22), किरण विजय दोड्डण्णावर (वय 22), रवी भीमसी चुनण्णवर (वय 22), केदारी बसवाणी जाधव (वय 36), सुनील मल्लिकार्जुन मुरकीभांवी (वय 43), संतोष पांडुरंग चिकडोळी (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या 9 जणांची नावे आहेत. हे सर्व जण गोकाकमधील मराठा गल्ली, मोकाशी गल्ली, सोमवारपेठ, अंबीगेर गल्ली, सिद्धेश्वरनगर, बसवनगर परिसरातील राहणारे आहेत.