कोणत्याही गोष्टीचा धाक तांत्रिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेलही मात्र सार्वजनिक, सामाजिक हितासाठी अंगी बाणावयाची शिस्त धाक घालून कोणाकडून अंगिकारली जाईलच असे नाही. गांभीर्याच्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धाक कोणी ध्यानात घेत नसल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे.
मार्च महिन्यापासून सुरू असलेला सर्वांचा कोरोनाविरोधातील लढा अजूनही सुरूच आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे. मात्र टाळेबंदी उठणे म्हणजे कोरोना गेला असे होत नाही. त्यात भर म्हणजे सणउत्सवांच्या काळात जो मोकाटपणा येत असतो त्यावेळी महामारीचा धाक नसल्याचेच प्रत्यंतर येते. पोटाची खळगी सर्वांनाच भरायची आहे. संसर्गभय असूनही टप्प्याटप्प्याने स्थिती अनलॉक होत आहे. प्रत्येक क्षेत्राची प्राथमिकता ध्यानात घेऊन ती खुली केली जात आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रयत्नातून कमी होत आहे. शेवटचा पर्याय म्हणजे त्यावर लस संशोधित करण्याचे काम आघाडीवर सुरू आहे. ही लस आल्यावर आपल्यातील बेफिकिरीचा गुण उभारून नक्की येईल. तोपर्यंत वैश्विक महामारी सुरू असताना घालून दिलेले नियम झिडकारण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे मग सार्वजनिक यंत्रणा कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धाक घालण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी हे नियम, संहिता पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेचा अंदाज केला जात आहे. त्यात थंडीची भूमिका कळीची ठरणार आहे. कोणत्याही गोष्टीचा धाक घालण्याने तांत्रिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेलही, मात्र सार्वजनिक हितासाठी अंगी बाणावयाची शिस्त धाक घालून येईलच असे नाही. ती शिस्त नसल्यानेच कोरोनाच्या दुसऱया लाटेचा निव्वळ धाक असा उल्लेख करावा लागत आहे. कितीही धाक घाला आम्हाला पाहिजे तेच आम्ही करणार अशा प्रवृत्तीची माणसे स्वतःसह समाजालाही अडचणीत आणतात. यातून नुकसान हे ठरलेले असते. त्यामुळेच नियम, दंड आणि धाकतंत्राचा अवलंब करण्यात येत आहे.
ज्या मुंबईकरांनी मे, जून अशा संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात दुधाची पिशवीसुद्धा साबणाच्या पाण्यात धुतल्याशिवाय घेतली नाही. काही मुंबईकरांनी कोरोनाच्या अतिरेकी भयाने वर्तमानपत्र वाचणे सोडून दिले तर काहींनी रुग्णालयात कामाला असणाऱया कर्मचाऱयांमुळे आपल्यालाही संसर्ग होईल या भयगंडाने सोसायटय़ांमध्ये प्रवेश दिला नाही, तेच मुंबईकर दसऱयाच्या आदल्या दिवशी दादरच्या बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत मोकाट दिसले. हा प्रसंग सांगण्याचे औचित्य म्हणजे तोंडावर आलेला दिवाळी सण. त्यानिमित्ताने पुन्हा बाजारहाट होणार आहे. यातून आरोग्ययंत्रणेने धसका घेतला आहे.
दिवाळी असल्याने एकमेकांच्या घरी जाणे टाळायचे आहे. दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना संभाव्य त्रास ध्यानात घेऊन आतषबाजी करण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. कोविडचा आजार फुफ्फुसाशी संबंधित असल्याने संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाची समस्या उद्भवू शकते. शरीरातील प्राणवायू पातळी कमी होते. दिवाळीच्या खरेदीसाठी शक्यतो बाहेर पडू नये. तसे केल्यास गर्दीच्या वेळा आणि ठिकाणे टाळावीत. मनाने माणूस कितीही धीट असला तरीही जीवावर बेतण्याची स्थिती असताना तो जीवाचाच अधिक विचार करतो, याचा प्रत्यय कोरोना काळात आलाच. मात्र अनलॉक होताना सणउत्सवांच्या उत्सवीकरणात सामील होताना त्याच जीवाची चिंता करू नये का असाही प्रश्न पडतोच. कोरोना कमी होत असताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुण्याच्या सवयी कमी होत आहेत हे प्रकर्षाने जाणवते.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्याचे आणि अनलॉक होताना सामाजिक जबाबदारी झिडकारण्याचे परिणाम सध्या युरोप खंडात दिसून येत आहेत. पाश्चात्य देशांतील नागरिकांनी जी चूक केली त्या चुकीची पुनरावृत्ती आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते. युरोप खंडाहूनही जवळ असलेल्या आपल्याच देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषण आणि थंडी वाढल्याने कोरोनाचा प्रभावही वाढलेला दिसून येतो. यातून धडा घ्यावा.
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवात केलेल्या शिथिलीकरणाचा परिणाम सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दिसून आला. नियम न पाळण्याने रोजची कोरोना नोंद 23 हजारावर गेली होती. त्याचा ताप सरकारी यंत्रणांसह सामान्य लोकांनाही सहन करावा लागला. आजही काही जणांच्या व्हॉटसऍपचे स्टेटस दुसऱया लाटेची खिल्ली उडवताना दिसून येतात. दुसऱया लाटेसाठी येणारी थंडी आणि दिवाळी कारण होऊ शकते. कोणत्याही विषाणूला थंडीत जोर येत असतो. आज मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील ओपीडीत तापसरीचे रुग्ण वाढल्याचे आकडेवारी सांगते. म्हणजेच हिवाळ्यात सर्दी, खोकला ताप यासारखे विषाणूजन्य आजार वाढतच असतात. यातून संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता असते.
सध्या राज्यात खंड न पडता कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी राज्यात 500 लॅब कार्यरत आहेत. थंडीत इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. इन्फ्लुएन्झा आणि कोरोनासारख्या आजारांमध्ये ताप हे प्राथमिक लक्षणांपैकी एक लक्षण असते. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. म्हणजेच मुंबई व राज्यात ताप सर्वेक्षणावर भर दिला आहे. दिवाळीची खरेदी ध्यानात घेऊन लोकांच्या रोज संपर्कात येणारे किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी यांच्या चाचण्यांवर भर दिला आहे. लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱयांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोरोनासाठी उपाय योजनेतील खासगी रुग्णालयांच्या 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय अद्यापही कायम आहे.
देशात दुसऱया लाटेची शक्यता कमी असली तरीही गांभीर्य ध्यानात घेऊन यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळेच थंडी, दिवाळी सण यामुळे कोरोनाची दुसरी लाट रोखण्यास सामाजिक कर्तव्यातून महामारीचे नियम पाळणे आवश्यक झाले आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठत असली तरी कोरोना अद्याप गेला नसल्याचे भान आपण ठेवणे शहाणपणाचे ठरेल.
राम खांदारे