प्रतिनिधी/ रत्नागिरा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हापूसची विक्री संकटात सापडली होती. मात्र, कृषी पणन मंडळाच्या साथीने जिह्यातील आंबा बागायतदारांनी यावर थेट आंबा विक्रीचा पर्याय काढला. हा प्रयोग खूपच यशस्वी ठरला असून केकणातून दोन लाखाहून अधिक हापूस पेटय़ा महाराष्ट्रासह परराज्यात पाठवण्यात आल्या. यामाध्यमातून बागायतदारांनी कोटय़वधींची उलाढाल केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस, त्यानंतर गायब झालेली थंडी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा हापूसचा हंगाम 2 महिने उशीरा चालू झाला. पहिल्या हंगामाचा हापूस बाजारात विकण्याची वेळ आणि कोरोना प्रादुर्भाव एकाचवेळी झाल्याने हापूस आंब्यावर अस्मानी संकट ओढवणार अशी भीती बागायतदारांना होती. लॉकडाऊनमुळे तयार होणारा आंबा विकायचा कसा असा प्रश्न त्याच्यासमोर ठाकला होता.
या समस्येवर तोडगा काढताना राज्याच्या कृषी तसेच कृषी पणन मंडळाने टाळेबंदी काळात हापूस आंब्याची ग्राहकांपर्यंत थेट विक्री करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या मोठय़ा शहरांबरोबरच अकोला, जळगाव, अहमदनगर यांसारख्या अन्य शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर हापूस पोहचला. आत्मा, कृषी विभागाकडून रत्नागिरी जिह्यातून सुमारे 70 हजार पेटी आंबा टाळेबंदीच्या काळात विकला गेला. त्यानंतर पणन विभागाकडूनही सुमारे 40 हजार डझन आंब्याची विक्री करून देण्यात आली.
थेट विक्रीचा फायदा
जुलै 2016 मध्ये राज्य शासनाने हापूसच्या थेट विक्रीला परवानगी दिली पण कोकणातील बागायतदारांनी त्याचा फारसा फायदा करून घेतला नाही. बाजारसमितीतील व्यापाऱयांकडे आंबा सोपवून ते देतील त्या भावावर बागायतदार समाधानी होते. टाळेबंदीमुळे कोकणात अडकून पडलेल्या बागायतदारांनी पारंपरिक विक्रीचे तंत्र झुगारून कोरोनाच्या संसर्गाला न घाबरता थेट घरपोच विक्री सुरु केली. त्यामुळे राज्यात दोन लाख पेटय़ांची थेट विक्री झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ग्राहकाला 2 हजार ते अडीच हजार रूपयांमध्ये घरपोच 5 ते 6 डझन आंबे मिळत असल्याने या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. हापूसची ग्राहकांना थेट विक्री करून सव्वाशे ते दीडशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे व्यापाऱयांच्या व खरेदीदारांच्या गेल्या अनेक वर्षांच्या साखळीवर परिणाम होणार आहे. अशा प्रकारच्या विक्रीतून बागायतदार व ग्राहक या दोघांचाही फायदा व समाधान झाले आहे.