बेळगाव / प्रतिनिधी
महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत भाडे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरीदेखील गाळेधारकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मनपाच्या महसूल विभागाने 9 गाळय़ांना टाळे ठोकले. या कारवाईनंतर काही गाळेधारकांनी तीन लाख रुपये भाडे जमा केले.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र, गाळेधारकांनी वेळेत भाडे भरले नसल्याने थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. मागील आठवडय़ात मटण मार्केटला टाळे ठोकण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने केली होती. आता सोमवारपासून त्यांनी आपला मोर्चा महात्मा फुले भाजी मार्केटकडे वळविला आहे. महात्मा फुले भाजी मार्केटमधील तीसपैकी 10 गाळेधारकांनी भाडे भरले नव्हते. गाळेधारकांकडे वीस लाखाहून अधिक रक्कम थकली होती. भाडे भरण्याची सूचना वारंवार करण्यात आली होती. मात्र, याची दखल गाळेधारकांनी घेतली नाही. त्यामुळे दोन दिवसांची मुदत देऊन गाळय़ांना टाळे ठोकण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी बजावला होता. त्यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी गाळेधारकांशी चर्चा करून भाडे जमा करण्याची सूचना केली होती. मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 11 पर्यंत भाडे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत प्रतीक्षा करण्यात आली. भाडय़ाची रक्कम भरण्यासाठी आणखी एक तासाचा अवधी वाढवून देण्यात आला. तरीदेखील गाळेधारकांनी भाडे जमा केले नाही, त्यामुळे अधिकाऱयांनी मंगळवारी धडक मोहीम राबविली. यावेळी गाळेधारकांनी आक्षेप घेऊन भाडे भरण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. भाडय़ाच्या रकमेपेक्षा दंडाची रक्कम जास्त होत आहे. त्यामुळे दंडाची रक्कम माफ करावी व केवळ भाडे जमा करून घ्यावे, अशी विनंती गाळेधारकांनी महसूल निरीक्षकांकडे केली. पण महापालिका कायद्यानुसार दंडाची रक्कम कमी करता येत नाही. महापालिकेच्या कायद्यानुसार दर तीन वर्षांनी भाडेवाढ आणि भाडे न भरल्यास दंडाची रक्कम वसूल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही रक्कम भरावी लागणार, असे सांगितले. त्यानंतर गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई करून 9 गाळे सील केले.
महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, परशुराम मेत्री, शिवा जाधव, अनिल बिर्जे, अर्जुन देमट्टी आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. टाळे ठोकल्यानंतर काही गाळेधारकांनी भाडय़ाची रक्कम भरणा केली. यामुळे टाळे ठोकताच मनपाच्या खजिन्यात रक्कम जमा झाली.