भारताने बंदी घातल्याचा परिणाम, इतर देशही निर्बंध घालण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टिकटॉक हे मोबाईल ऍप व्यवस्थापित करणारी कंपनी बिटेडान्सची भारतीय शाखा आता चीनपासून आपले संबंध तोडण्याच्या तयारीत आहे. भारताने या ऍपवर काही दिवसांपूर्वीच बंदी घातली आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी घट होणे अपेक्षित आहे. अमेरिकेनेही या ऍपवर बंदीचा विचार केला आहे.
लडाख नियंत्रण रेषेवर चीनने आक्रमकपणा दाखवून भारताशी संघर्ष केल्याने भारताने चीनला आर्थिक दणका देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चीनच्या टिकटॉकसह 59 ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला 40 हजार कोटी रूपयांचा फटका बसण्याचे अनुमान होते. अमेरिकेनेही बंदी घातल्यास या कंपनीची अधिकच आर्थिक हानी होणार होती.
चीन एकटा पडला
चीन आता जगातील इतर देशांपासून एकटा पडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे टिकटॉकच्या भारतीय शाखेने चीनच्या मातृकंपनीपासून दूर होण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला. बिटेडान्स ही मूळ चीनी कंपनी आहे. या कंपनीची भारतात शाखा असली तरी भारतात वेगळे मुख्यालय नाही. त्यामुळे भारतीय शाखा पूर्णतः चीनशीच जोडली गेली आहे.
सर्वांचा विचार करणार
टिकटॉक हे ऍप भारतात अत्यंत लोकप्रिय होते. दरवर्षी साधारणतः 60 कोटी लोक त्याचा उपयोग करीत असत. त्यामुळे भारतातून चीनच्या मूळ कंपनीला हजारो कोटी रूपयांचा लाभ होत होता. पण आता हे ऍप बंद झाल्याने या कंपनीची भारतीय शाखाही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या शाखेच्या व्यवस्थापकांनी चीनच्या मूळ कंपनीपासून वेगळे होण्याची योजना आखली. वेगळे होताना आपण उपयोगकर्ते, कलाकार, कर्मचारी, व्हिडीओ निर्माते, भागीदार आणि धोरणकर्ते या साऱयांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेऊ असे भारतीय शाखेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने कंपनीची आखणी सुरू आहे.
स्वतंत्र कंपनी काढणार ?
बिटेडान्स कंपनीची भारतीय शाखा भारतात स्वतंत्र कंपनी स्थापन करणार का, हा प्रश्न सध्या उद्योग जगतात चर्चिला जात आहे. स्वतंत्र कंपनी स्थापन केल्यास भारतीयांचा विश्वास पुन्हा प्राप्त करता येईल, असाही विचार आहे. तथापि, या शाखेचे चीनशी पूर्वी संबंध असल्याने भारतीय उपयोगकर्ते नव्या कंपनीला कितपत स्वीकारतील यासंबंधीही चर्चा सुरू असल्याचे समजते.
मोठा पसारा
चीनी टिकटॉक कंपनीचा मोठा विस्तार जगभरात आहे. जगातील 200 कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. त्यातून कंपनीला दरवर्षी 600 कोटी डॉलर्सची प्राप्ती होत असते. पाच वर्षांपूर्वी हे ऍप अस्तित्वात आले. मात्र हे ऍप डाऊनलोड करताना दिल्या जाणाऱया व्यक्तीगत माहितीचा गैरवापर केला जातो. ही महिती इतरांना दिली जाते. तसेच देशाच्या सुरक्षेला या ऍपचा धोका आहे, असे अनेक आरोप मूळ कंपनीवर करण्यात आले आहेत. कंपनीने आरोपांचा इन्कार केला असला तरी अनेक देश निर्बंध लादण्याच्या विचारात आहेत.