मोदी सरकारने बंदी घातल्याचा परिणाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चिनी सोशल मीडिया कंपनी बाईटडान्स कंपनीने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉक, हॅलोसह चिनी बनावटीच्या अनेक ऍप्सवर बंदी घातली होती. ही बंदी अद्यापही कायम आहे. त्यानंतर आता बाईटडान्स कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. टिकटॉकचे जागतिक अंतरिम प्रमुख वेनेसा पाप्पस यांनी भारतातील कर्मचाऱयांना ई-मेल पाठवला असून त्यात या निर्णयाची माहिती दिली आहे. तसेच कंपनीने बुधवारी एका टाऊन हॉलचे आयोजन करत भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या भारतातील कर्मचाऱयांवर परिणाम होणार आहे.
बाईटडान्स कंपनीच्या अधिकाऱयांनी भारतात पुन्हा व्यवसाय सुरू करण्याबद्दल अनिश्चितता व्यक्त केली. भारतात पुन्हा व्यवसाय कधी सुरू करु हे आम्हाला ठाऊक नाही. आम्ही आमच्या ऍप्सकडून स्थानिक कायद्यांचे, नियमांचे पालन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले आमचे ऍप्स कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता मिळत नसल्याने तूर्तास कंपनीची कार्यप्रणाली थांबविण्यात येत असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
भारत सरकारने जून 2020 मध्ये 59 ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अनेक मोबाईल ऍप्सचा गैरवापर केल्याच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.