वाहनधारकांना अडचण : नळजोडण्या नसल्याने पाण्याची समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सीटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत टिळकवाडी परिसरातील रस्त्यांवर पेव्हर्स घालून रस्ते स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या परिसरात नळजोडण्या देण्यात आल्या नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. तसेच रस्त्याशेजारी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात आले नसल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे.
टिळकवाडीतील विविध पेठेतील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. रस्त्याशेजारी गटारीचे बांधकाम करून पेव्हर्स घालून सुसज्ज रस्ते बनविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी हे काम सुरू असून, पेव्हर्सचा वापर करण्यात येत आहे. मात्र रस्त्याचा विकास करण्यापूर्वी नागरिकांना नळजोडण्या करून देणे आवश्यक आहे. पण बहुतांश रहिवाशांना नळजोडण्या देण्यात आल्या नसल्याने पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नळजोडणी करून देण्यासाठी नागरिकांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार नोंदविली होती. पण 24 तास पाणी योजनेतील जलवाहिनी घालताना नळजोडणी करण्यात येईल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे नळजोडणी केव्हा मिळणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मंगळवारपेठेतील रस्त्यावर पेव्हर्स घालून विकास करण्यात येत आहे. रस्त्यावर पेव्हर्स घालण्याचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेले खड्डे अद्यापही बुजविण्यात आले नाहीत. याठिकाणी खड्डय़ाशेजारी पेव्हर्स ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.