सोमवारपेठेत रस्त्यावर चिखल, वाहनधारकांना धोका
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत टिळकवाडी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र सदर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे टिळकवाडी परिसरातील रहिवाशांना चिखलमय रस्त्यावरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. अर्धवट कामे कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीमधील रस्ते निर्माण करण्यासाठी कोटीचा निधी खर्च केला जात आहे. पण रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने वाहनधारकांना तसेच रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. टिळकवाडी परिसरातील सर्व रस्त्यांवर पेव्हर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील विविध रस्त्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. पण काही रस्त्यांची कामे अर्धवट असून, पूर्ण करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. सोमवारपेठ परिसरात कामे अर्धवट राहिल्याने रस्त्यावर माती ठेवण्यात आली होते पण अलिकडे सुरू असलेल्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पेव्हर्सच्या रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने वाहनधारकासह पादचाऱयांना ये-जा करणे कठिण बनले आहे.
रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना आता चिखलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. घराबाहेर पडताच चिखलातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. रस्त्याचे काम पूर्ण करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. याचा फटका रहिवाशांना बसत आहे. अर्धवट असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
परिसरात रस्त्याचे काम करताना काही रहिवाशांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या होत्या. रस्ता करण्यापूर्वी नळजोडण्या पूर्ववत जोडून देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. टिळकवाडी परिसरातील नळजोडण्या करण्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांचे तसेच स्मार्ट् सीटी अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. याचा फटका नागरिकांना सोसावा लागत असून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे.