प्रतिनिधी/ बेळगाव
बस सेवा सुरू होऊनही बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. वारंवार मागणी करूनही परिवहन मंडळ नव्याने वेळापत्रक प्रसिद्ध करत नाही. परिणामी कोणत्या वेळी कोणती बस येणार याची कल्पना नसल्याने प्रवाशांना तासनतास थांब्यावर ताटकळत रहावे लागत आहे. स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने बसना वळसा घालून यावे लागते. त्यामुळे वेळ होत असल्याचे परिवहन मंडळ म्हणते. मात्र त्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येत घट होण्यात होत असून, त्यामुळे मंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.
लॉकडाऊन काळात परिवहन मंडळाचे अतोनात नुकसान झाले. ते नुकसान भरून काढण्यासाठी मंडळाने अनलॉक झालेल्या परिस्थितीचा फायदा घेणे आवश्यक आहे. मात्र मंडळाची उदासीनताच नुकसानीला कारणीभूत ठरत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
शहरातील काही प्रमुख भागांमध्ये बसची संख्या वाढत आहे. त्यामध्ये अनगोळ आणि वडगाव भागांना सातत्याने बसची ये-जा आहे. मात्र टिळकवाडीला बसची संख्या अत्यंत नगण्य आहे. वडाप रिक्षा चालकांनी रिक्षाचे दर प्रत्येकी 20 रुपये केल्याने सामान्य प्रवासी बसने जाणे पसंत करतो. बस तिकिटाचा दर रिक्षाच्या तुलनेत कमी आहे. मात्र बस येत नसल्याने सामान्य आणि गरीब प्रवाशांना विनाकारण 5 ते 7 रुपये अधिक मोजून रिक्षाने जावे लागते.
टिळकवाडीला मुळातच बस कमी आहेत. त्यातच साधारण कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी 9.30 ते 10 व सायंकाळी 5.30 ते 6 या दरम्यान बसची गरज आहे. परंतु नेमक्मया याच वेळेत बस उपलब्ध नाहीत. बेळगाव आगाराने सायंकाळी 6.15 वा. धर्मवीर संभाजी चौक येथे येणाऱया बसची वेळ बदलली असून, आता ही बस 6.30 वा. सीबीटीहून सुटते व 6.45 पर्यंत संभाजी चौकात येते.
अद्याप बसना पूर्वीसारखी गर्दी नसली तरी प्रवासी संख्या समाधानकारक आहे. मात्र एकूण वातावरण लक्षात घेता सायंकाळी 7 नंतर बस थांब्यांवर थांबणे कठिण होते. त्यातच बस थांबे असूनही जनावरांनीच तेथे आक्रमण केल्याने प्रवाशांना प्रामुख्याने महिलांना तेथे बसताही येत नाही. त्यामुळे प्रवाशांची सोय आणि वेळ लक्षात घेऊन मंडळाने बस सोडाव्यात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
बसफेऱया वेळेवर सुरू राहण्याकडे लक्ष देऊ
प्रवाशांची सोय ही महत्त्वाची आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे बसचे मार्ग सतत बदलत आहेत. मात्र टिळकवाडीला बसफेऱया वेळेवर सुरू राहतील याकडे आपण लक्ष देऊ आणि 6.15 ची गुरुप्रसाद कॉलनीची बस पूर्ववत सुरू ठेवू, असे विभागीय संचार अधिकारी के. के.लमाणी यांनी सांगितले.