भंगीबोळांना कचराकुंडीचे स्वरूप : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील बहुतांश भंगीबोळातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली होती. काही भंगीबोळात पेव्हर ब्लॉक घालून रस्ते करण्यात आले. मात्र भंगीबोळांना कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी भंगीबोळांची दुरवस्था झाली असल्याने अस्तित्व धोक्यात आले आहे.
अतिक्रमणामुळे शहरातील भंगीबोळांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. विशेषतः टिळकवाडी, शहापूर, शिवाजीनगर, बाजारपेठ परिसरातील भंगीबोळामध्ये अतिक्रमण झाले असल्याच्या तक्रारी होत असतात. टिळकवाडी परिसरातील भंगीबोळातील अतिक्रमणाकडे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कानाडोळा केला असल्याने भंगीबोळात कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. जुन्या इमारतीची माती, बांधकाम साहित्य टाकण्यात येत असल्याने भंगीबोळातील रस्ते बंद झाले आहेत. बहुतांश ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भंगीबोळातील गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याने दुर्गंधीच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे.
हिंदूनगर येथील छत्रपती रोडपासून रवींद्रनाथ टागोर रोड येथील भंगीबोळात लहान-मोठी झाडेझुडूपे वाढून गलिच्छ झाले आहेत. येथील बोळांमध्ये पेव्हर्स ब्लॉक बसवण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. येथील काही बोळांमध्ये पेव्हर्स ब्लॉक बसविण्यात आले आहेत. पण उर्वरित ठिकाणी बसविण्यात आले नाहीत. यामुळे येथील रहिवाशांना दुर्गंधी, डास, घुशींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्यामुळे येथे कचरा साचतो. याचा प्रामुख्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
भंगीबोळात कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने डुकरांचा वावर वाढला आहे. प्रत्येक भंगीबोळात डुकरांचे कळप वास्तव्यास असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच भंगीबोळातील स्वच्छता केली जात नसल्याने झाडेझुडूपे आणि रान उगवले आहे. परिणामी सापाकिडय़ांचे वास्तव्य वाढले आहे. उपनगरांबरोबर बाजारपेठेतील भंगीबोळांची दुरवस्था झाली आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. यामुळे भंगीबोळाची पाहणी करून याबाबत आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
याबाबत महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे विचारणा केली असता, कचरा हटविण्यासाठी शहर आणि उपनगरांमधील भंगीबोळ स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याबाबत पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांना सूचना करून तातडीने कारवाई करण्यात येईल, असे सागितले.