परिसंवादातून उलगडले जीवनाचे अनेक पैलू
प्रतिनिधी /पणजी
सुमारे 140 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी शेती आणि जलसंवर्धनासंबंधी वेळोवेळी मांडलेले विचार आजही किती प्रभावी आणि संयुक्तिक आहेत, त्याचा पट उलगडविणारे ओघवते विचार रविवारी पणजीत आयोजित परिसंवादातून श्रोत्यांना तृप्त करून गेले.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा संस्थेतर्फे लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गोविंद काळे, प्रा. विनय बापट आणि प्रा. दिलीप बेतकीकर यांचा या परिसंवादात सहभाग होता.
प्रा. विनय बापट
ज्याचा मृत्यू देखील जगण्याचे हजारो किरण इतर माणसांना देऊन जातो त्याची आपण पुण्यतिथी साजरी करतो, आणि असे व्यक्तिमत्व म्हणजे बाळ गंगाधर टिळक होते. टिळकांनी मृत्यूनंतर देखील जगण्याची उर्जा सर्वांना दिली. म्हणुनच लोकमान्य टिळकांनी जो एक ध्येयवाद आपल्यासमोर ठेवला त्यानुसार चालणे हे आपल्या जीवनाला नवी दिशा देऊन जाते. टिळकांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या सेनापती बापट यांना त्यांच्या स्वतःच्या पत्नीचे निधन झाल्याची माहिती मिळते. तरीही ते अंत्ययात्रेतच राहिले. ’आपले अर्धांग तर गेलेलेच आहे, या महामानवाला शेवटचा निरोप देतो आणि घरी येतो’, असे ते म्हणाले. यावरून लोकमान्यांची महानता दिसून येते, असे प्रा. बापट यांनी सांगितले.
लोकमान्य म्हटले म्हणजे आपल्या मनात सर्वप्रथम चित्र उभे राहते ते त्यांच्या पत्रकारितेतील कारकीर्दीचे. परंतु त्यांच्या जीवनाचे अनेक असे पैलू आहेत जे अनेकांना आजही माहित नाहीत. टिळकांचे शेतीसंबंधी विचार 140 वर्षांपूर्वी सुद्धा अत्यंत प्रगल्भ होते. शेती कशी करावी इथपासून पाण्याची व्यवस्था आणि संवर्धनापर्यंत, त्याचबरोबर नद्या जोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागांसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण करणे, कालव्यांची निर्मिती, पावसाचे वाया जाणारे पाणी जिरविणे यासारखे विचार मांडणारे कित्येक लेख त्यांनी लिहिले होते. थोडक्यात म्हणजे शेतकरी जगला तरच देश जगणार आहे, हेच तत्वज्ञान त्यांनी मांडले होते, असेही प्रा. बापट म्हणाले.
शिक्षण हा व्यापक विषय टिळकांनी मांडला होता. शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या कल्पना, धारणा, विचार, चिंतन त्यातून दिसून येत होते. राष्ट्रीय शिक्षण हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी ’राष्ट्रीय शिक्षण’ मिळाले पाहिजे, अशी कल्पना त्यांच्या मनात होती. व्यक्ती व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रीयत्वाचे स्पुल्लिंग चेतवले जाईल, तरुणांच्या मनात राष्ट्रीयत्वाची ज्योत निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण. अशा राष्ट्रीय शिक्षणाची त्याकाळी वानवा होती. इंग्रजांनी येथील शिक्षणाचे हेतुपुरस्सर खच्चीकरण केले होते. कारण लोकांना अशिक्षित आणि अर्धशिक्षित ठेवण्यातच फायदा आहे हे इंग्रजांनी जाणले होते. त्याला प्रत्यत्तर म्हणून टिळकांनी त्याच शिक्षणाच्या माध्यमातून भारताला दुसऱयांदा स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार केला होता. त्याची मुहूर्तमेढ त्यांनी ठिकठिकाणी शाळा सुरू करून रोवली. कालिदासांचे वर्णन करताना ज्याप्रकारे ’शेक्सपियर ऑफ इंडिया’ म्हटले जाते त्याच प्रकारे शेक्सपियरचे वर्णन करताना त्यांना ’कालिदास ऑफ इंग्लंड’ म्हटले पाहिजे, असा त्यांचा शिक्षणाचा त्यांचा दृष्टीकोन होता. इंग्रजांनी आपल्या मानगुटीवर बसवलेले इंग्रजीचे भूत झटकून टाकले पाहिजे. मातृभाषेचा अंगिकार केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. कारण त्यांना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व समजले होते. शिक्षणाच्या विविध पैलूंबद्दल ते अत्यंत जागृत होते. मैदानी शिक्षणालाही ते फार महत्व देत होते, त्याचे समर्थन करत होते. राष्ट्रीय शिक्षण देणाऱया शाळा सुरू झाल्या तेव्हा अनेकांनी तत्कालिक सरकारी वगैरे शाळा सोडून राष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती बेतकीकर यांनी दिली.
शिक्षकांनी केवळ एखाद्या विषयाचे शिक्षक न बनता विद्यार्थी घडविणारे शिक्षक बनले पाहिजे, असे टिळकांना अपेक्षित होते. त्याचबरोबर चार भिंतींच्या आत शिक्षण देण्यापेक्षा लोकांच्या पर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, अशीही त्यांची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी शिवजयंती, गणेशोत्सव असे सार्वजनिक उपक्रम राबविले व लोकशिक्षण देण्याचे प्रयत्न केले. उत्सव, सणांच्या माध्यमातून राष्ट्रामध्ये चेतना, स्फूर्ती निर्माण होते. म्हणुनच असे राष्ट्रीय सण, उत्सव साजरे झाले पाहिजे, असे टिळकांचे विचार होते. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागली पाहिजे, त्यांनी खूप वाचले पाहिजे, असाही टिळकांचा आग्रह होता, असेही प्रा. बेतकीकर यांनी सांगितले.
गीता हा टिळकांचा श्वास होता
टिळकांकडे गीता होती. कारागृहात असताना तब्बल 800 पानांचा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. एवढे अगाध सामर्थ्य त्यांच्यात होते. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली व अनेक काव्ये निर्माण झाली. त्यांच्या प्रमाणेच विनोबा भावे यांनीही तुरुंगात असताना गीतेवरील प्रवचने लिहिली. त्याकामी त्यांना साने गुरुजी सारखा लेखनीक मिळाला. टिळकाच्या व्यक्तिमत्वात तप होते, कर्म होते, तपश्चर्या आणि ज्ञानही होते. अशा प्रकारचे अद्वितीय कार्य अनेक विषयांमध्ये ते करू शकले कारण त्यांचा आधार, त्यांचा श्वास हा भगवद्गीता होता. त्यांच्या आयुष्याला गीता व्यापून होती, असे डॉ. गोविंद काळे यांनी सांगितले.
अशा टिळकांच्या कार्यातून भारलेल्या वातावरणातून अनेकांनी स्फूर्ती घेतली व प्रगल्भ विचार मांडू शकले. पाठय़पुस्तकांच्या पलिकडेही एक जग आहे याची जाणीव झाल्यामुळेच टिळकांनी ग्रंथालयांचा आग्रह धरला. गुणांवर प्रेम करायला शिका, असे संदेश त्यांनी दिला. सहकाराची कल्पनासुद्धा लोकमान्यांनीच मांडली होती, त्यांच्याच प्रेरणेतून 1917 मध्ये भारतातील पहिली सहकारी संस्था जन्मास आली. असे अनेक विषय टिळकांनी हाताळले. म्हणुनच ते लोकमान्य बनले, अशी माहिती डॉ. काळे यांनी दिली.