केंद्र सरकारने घेतला निर्णय : शिक्षक होऊ इच्छिणाऱयांना होणार लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटीच्या) उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी 7 वर्षांपासून वाढवत आजीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वलक्ष्यी म्हणजेच 2011 पासून लागू होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ही घोषणा केली आहे.
प्रमाणपत्राचा 7 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या उमेदवार किंवा विद्यार्थ्यांविषयी संबंधित राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रशासन टीईटीचा वैधता कालावधी नव्याने ठरविणे किंवा नवे टीईटी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी आवश्यक पावले उचलणार असल्याचे निशंक म्हणाले.
टीईटीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राचा वैधता कालावधी सद्यकाळातील 7 वर्षांवरून वाढवत आजीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःची कारकीर्द घडवू पाहणाऱया उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार आहेत, असेही त्यांनी नमूद पेले आहे.
शाळांमध्ये शिक्षकाच्या स्वरुपात नियुक्तीसाठी कुठल्याही व्यक्तीच्या पात्रतेसंबंधी शिक्षक पात्रता परीक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) 11 फेब्रुवारी 2011 रोजीच्या दिशानिर्देशांमध्ये राज्य सरकार टीईटीचे आयोजन करणार आणि टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्राचा वैधता कालावधी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून 7 वर्षांपर्यंत राहणार असल्याचे म्हटले गेले होते.