माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचे पत्र संस्थाचालकांना
प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या निकषानुसार शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता परीक्षा पास नसलेल्या शिक्षकांची माहिती अद्यापही माध्यमिक शिक्षण विभागास ज्या संस्थांनी दिलेली नाही. टीईटी परीक्षा पास नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या पत्रच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांना काढले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शिक्षणाचा दर्जा सुधारावा, भावी पिढी सक्षम चांगली घडावी, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभागाने अद्यादेश काढून सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले होते. मात्र, अद्यापही अनेक शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले नसल्याने त्यांचा विपरित परिणाम शिक्षणावर होत आहे. शासन निर्णयातील तरतूदीनुसार टीईटी नापास असणाऱया शिक्षकांवर संबंधित पात्र संस्थांनी कारवाई करणे गरजेचे आहे. पात्रता परिक्षा उतीर्ण नसणाऱया शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या सुचना असतानाही अद्याप संबंधितांना वेतन देण्यात येत आहे. टीईटी नापास शिक्षकांची माहिती घेवून माध्यमिक शिक्षण विभागास देवून त्यांचे वेतन थांबवण्यात यावे अशा सुचना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. टीईटी नापास शिक्षकांची जिह्यातील संस्थांना माहिती मागवून त्यांच्याकडून वेळेवर मिळत नाही. याबाबत अनेकदा वरीष्ठ कार्यालयाकडून या संस्थांची विचारणाही झाली आहे. त्यामुळे या संस्थांनी अशा शिक्षकांची माहिती देवून वेतन थांबवावे. संबंधिताचे वेतन संस्थेने सुरु ठेवल्यास त्याची जबाबदारी त्या संस्थेवर राहिल. संबंधित शिक्षकांची माहिती न दिल्यास त्यांची वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत, असेही माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.