पुणे / प्रतिनिधी
केवळ टीका करत देशात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत फिरतात, ते कोकणात मात्र निवडणुकीत पडतात, असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पिंपरी येथे लगावला.
‘शब्द पब्लिसिटी’ संस्थेच्यावतीने कोरोना काळात विशेष कार्य करणाऱया व्यक्तींना ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार देऊन सामंत यांच्याहस्ते सन्मानित केले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शहर संघटक संतोष सौंदणकर, शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, जे टीका करतात, ते आपल्या कर्माने संपतात. मी टीका करणारा मंत्री नाही. टीका करणाऱयांना उत्तरही देत नाही. टीका करणारे मात्र कोकणात निवडणुकीत पडतात. मी काही चुकत असेल, तर माझ्या विधानसभा मतदारसंघात उभे राहून निवडून येऊन दाखवा, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. हल्ली पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. ही आपली संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे मतही त्यांनी नोंदवले.