वृत्तसंस्था/ दुबई
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयासाठी भारतीय संघातील इतर खेळाडू तसेच प्रशिक्षक वर्ग संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाला आहे. सध्या येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबाद संघाने रॉयल चँलेजर्स बेंगळूर संघाचा पराभव केला. या पराभवामुळे कोहलीच्या बेंगळूर संघाचे आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता कर्णधार विराट कोहली टीम इंडियाच्या जैव सुरक्षित वातावरणात दाखल झाला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघ दुबईत काही दिवस क्रिकेटचा सराव करणार आहे. भारतीय संघाच्या सरावाला येत्या दोन दिवसामध्ये प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या मयांक अगरवाल तसेच चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी आपल्या सरावाला यापूर्वीच सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱयात ऍडलेडची कसोटी दिवस-रात्रीची खेळविली जाणार असून या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे. भारतीय खेळाडूंना दिवस-रात्रीच्या कसोटीचा तसेच गुलाबी रंगाच्या चेंडूवर खेळण्याचा सराव होणे जरूरीचे आहे.