यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघाचा 2-0 फरकाने एकतर्फी विजय, स्मृतीचे अर्धशतक निष्फळ
वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट
यजमान ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने भारताविरूद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. रविवारी झालेल्या या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 14 धावांनी पराभव केला. स्मृती मानधनाचे अर्धशतक वाया गेले.
या शेवटच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 149 धावा जमवित भारताला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर स्मृती मानधनाने शानदार अर्धशतक नोंदवूनही तिला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने 20 षटकांत 6 बाद 135 धावापर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 14 धावांनी जिंकत मालिका 2-0 अशी हस्तगत केली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये सलामीच्या बेथ मुनीने शानदार अर्धशतक झळकावताना 43 चेंडूत 10 चौकारांसह 61 धावा जमविल्या. तसेच ऑस्ट्रेलियन संघातील मॅकग्राने 31 चेंडूत नाबाद 44 धावा झळकविताना जॉर्जिया व्हेरहॅमसह सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 32 धावांची भागीदारी केली. व्हेरहॅमने 8 चेंडूत नाबाद 13 धावा जमविल्या. मॅकग्राने आपल्या खेळीत 1 षटकार आणि 6 चौकार ठोकले. कर्णधार लेनिंगने 14 चेंडूत 14, हिलीने 4, गार्डनरने 1, पेरीने 11 चेंडूत 8 धावा जमविल्या. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाडने 37 धावांत 2 तर रेणुका सिंग आणि पूजा वस्त्रकार तसेच दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली होती.
प्रत्युत्तरादाखल भारताच्या डावात सलामीच्या स्मृती मानधनाने 49 चेंडूत 52 धावा झळकविताना जेमिमा रॉड्रिग्यूजसमवेत दुसऱया गडय़ासाठी 57 धावांची भागीदारी केली. 10 व्या षटकाअखेर भारताने 54 धावापर्यंत मजल मारताना शफाली वर्माची विकेट गमावली होती. शफाली वर्माने केवळ 1 धाव जमविली. मानधनाने आपल्या खेळीत 8 चौकार ठोकले. रॉड्रिग्यूज व्हेरहॅमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.
नंतर कॅरेने स्मृती मानधनाला लेनिंगकडे झेल देण्यास भाग पाडले. कर्णधार हरमनप्रित कौरने 16 चेंडूत 13, पूजा वस्त्रकारने 5, रिचा घोषने 11 चेंडूत नाबाद 23 धावा, दीप्ती शर्माने 8 चेंडूत नाबाद 9 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे कॅरेने 42 धावांत 2 तर गार्डनर, व्हेरहॅम आणि सुदरलँड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताने 15 व्या षटकाअखेर 3 बाद 93 धावापर्यंत मजल मारली होती पण ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर भारताने आपले शेवटचे चार गडी केवळ 10 धावांत गमविले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 5 बाद 149 (बेथ मुनी 61, लेनिंग 14, हिली 4, गार्डनर 1, पेरी 8, मॅकग्रा नाबाद 44, व्हेरहॅम नाबाद 13, गायकवाड 2-37, रेणुका सिंग 1-23, वस्त्रकार 1-24, दीप्ती शर्मा 1-24)
भारत 20 षटकांत 6 बाद 135 (स्मृती मानधना 52, शफाली वर्मा 1, रॉड्रिग्यूज 23, हरमनप्रित कौर 13, वस्त्रकार 5, रिचा घोष नाबाद 23, देवल 2, दीप्ती शर्मा नाबाद 9, कॅरे 2-42, गार्डनर 1-22, व्हेरहॅम 1-15, सुदरलँड 1-13).