बीसीसीआय कौन्सिलची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना व्हिसा देण्यात येणार असल्याची हमी सरकारकडून मिळाली असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले.
बीसीसीआय कौन्सिलला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी याची माहिती दिली. तसेच या स्पर्धेतील सामन्यासाठी 9 केंद्रे निश्चित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूर, हैदराबाद, धरमशाला, लखनौ या केंद्रांवरही सामने खेळविले जाणार आहेत. ‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या व्हिसाची अडचण दूर करण्यात आली आहे. मात्र तेथील चाहत्यांना सामने पाहण्यासाठी भारतात येऊ देण्याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही,’ असे कौन्सिलमधील एका सदस्याने सांगितले. ‘त्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. आयसीसीला आम्ही तशी हमीही दिली आहे,’ असे जय शहा यांनी या बैठकीत सांगितले. राजकीय तणावामुळे भारत व पाक यांच्यात सुमारे दशकभर द्विदेशीय क्रिकेट सामने झालेले नाहीत. त्यामुळे व्हिसा मिळण्याबाबत साशंकता वाटल्याने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्याबाबत पाकने आयसीसीकडे तशी हमी मागितली होती.