वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघनिवड पुढील आठवडय़ात केली जाणार आहे. भारत व इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी झाल्यानंतर निवड समिती सदस्य यासाठी एकत्र येणार आहेत. संघ घोषित करण्याच्या अंतिम तारखेबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी पुढील शुक्रवारपर्यंत त्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
या घडामोडीची माहिती असणाऱया सूत्राने सांगितले की, ‘चौथी कसोटी संपल्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघनिवड केली जाणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी ती होईल, असे सध्या तरी वाटते. पण त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र पुढील शुक्रवारपर्यंत त्याची घोषणा होणार हे नक्की आहे. कारण 10 सप्टेंबर ही संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत आयसीसीने दिलेली आहे,’ असे या सूत्राने स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी आतापर्यंत न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोनच देशांनी संघ जाहीर केले आहेत.
17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात, ओमान येथे सुरू होत असून भारत व पाकिस्तान यांची जंगी लढत 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेची अंतिम लढत दुबईत 14 नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीनंतर सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पहिला उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी अबु धाबीत, दुसरा उपांत्य सामना 11 नोव्हेंबरला दुबईत होणार आहे. या दोन्ही सामन्यांना राखीव दिवस ठेवण्यात आला असून अंतिम लढतीसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.