वनडे वर्ल्ड कपमध्ये 2027 पासून 14 संघांचा सहभाग, चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा सुरू होणार
वृत्तसंस्था/ दुबई
पुढील आठ वर्षाच्या फ्युचर्स टूर्स प्रोग्राममध्ये (एफटीपी) टी-20 विश्वचषक स्पर्धा दर दोन वर्षानी आयोजित करण्याचा तसेच 50 षटकांची वनडे विश्वचषक स्पर्धा 2027 पासून पुन्हा 14 संघांत खेळविण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे आयसीसीने सांगितले.
याशिवाय पुढील एफटीपीमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपही चार वेळा घेण्यात येणार असून दोन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही होणार आहेत. ‘2024 ते 2031 पर्यंतच्या आयसीसीतर्फे भरविल्या जाणाऱया स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून पुरुषांच्या वनडे वर्ल्ड कप व टी-20 वर्ल्ड कप या दोन्ही स्पर्धांचा विस्तार करण्यात येणार आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे,’ असे आयसीसीने बोर्डाच्या बैठकीनंतर निवेदनाद्वारे सांगितले. ‘पुरुषांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आता 14 संघांचा सहभाग असणार आहे. त्यानुसार 2027 व 2031 मध्ये होणाऱया या स्पर्धांत 54 सामने खेळविले जातील. पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपचा विस्तारही वाढविला जाणार असून त्यात आता 20 संघांना सामील करून घेतले जाईल. 2024, 2026, 2028, 2030 मध्ये होणाऱया या स्पर्धांत 55 सामने आयोजित केले जाणार आहेत,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
50 षटकांची वनडे विश्वचषक स्पर्धा सध्या 10 संघांत खेळविण्यात येते तर यावर्षी होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असणार आहे. ‘2025 व 2029 मध्ये होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आठ संघांचा समावेश असेल. याशिवाय आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स 2025, 2027, 2029, 2031 यावर्षी खेळविल्या जातील. महिलांच्या स्पर्धांचा कार्यक्रम याआधीच निश्चित करण्यात आला असून महिला क्रिकेटच्या वाढीसाठी वनडे वर्ल्ड कप व टी-20 वर्ल्ड कप स्पर्धांचा विस्तार करण्यात आला आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये सात संघांचे दोन गट करण्यात येतील आणि प्रत्येक गटातील पहिले तीन संघ सुपरसिक्स फेरीत खेळतील. त्यानंतर उपांत्य व अंतिम सामने घेण्यात येणार आहेत. 2003 मध्ये याच फॉरमॅटचा वापर करण्यात आला होता.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाच संघांचे चार गट करण्यात येणार असून प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर एट फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर उपांत्य व अंतिम लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच्या आवृत्तीनुसारच खेळविण्यात येणार असून चार संघांचे दोन गट करण्यात येतील आणि नंतर उपांत्य व अंतिम सामने खेळविले जातील.