वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विस्ताराची योजना आयसीसीने आखली आहे. सध्या या स्पर्धेत संघांची संख्या 16 आहे. भविष्यकाळात आयसीसीतर्फे या स्पर्धेसाठी 20 संघांना प्रवेश देण्याचा प्रयत्न चालू आहे.
2021 टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रुपरेषेमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. सदर स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांना प्रवेश मिळाला आहे. मात्र 2024 साली होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघांच्या संख्येमध्ये वाढ केली जाणार असून आणखी चार संघांना प्रवेश देण्याचा विचार चालू आहे. त्याचप्रमाणे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विस्तारीकरणाचा विचार आयसीसीने सुरू ठेवला आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली होती. त्या स्पर्धेत 14 ऐवजी 10 संघ सहभागी झाले होते. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. दरम्यान भारतातील सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यास या स्पर्धेवर साशंकतेचे सावट निश्चितच पसरल्याचे जाणवते. आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोरोना महामारी परिस्थितीमुळे अर्धवट स्थितीत बेमुदत कालावधीसाठी तहकूब करावी लागली. आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये भरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.