ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची तयारी करण्याची सूचना,
वर्ल्डकपबाबत पुढील आठवडय़ात अधिकृत घोषणा शक्य, टी-20 विश्वचषक रद्दची घोषणा लवकरच?
वृत्तसंस्था / मेलबर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध सप्टेंबरमधील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेची तयारी करण्याची सूचना ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने दिली असून हे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द करण्याचे संकेत मानले जातात. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, यंदाची आयसीसी विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, कोव्हिड-19 च्या संकटामुळे स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द केली गेली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत याच कालावधीत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा भरवली जाईल, असे स्पष्ट संकेत आहेत.
‘आयसीसी टी-20
विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली जाईल, हे जवळपास निश्चित आहे आणि याची अधिकृत घोषणा या आठवडय़ात होऊ शकते’, असे वृत्त ‘द डेली टेलिग्राफ’ या ऑस्ट्रेलियन दैनिकाने दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली तर करारबद्ध खेळाडू इंग्लंडमधील मालिका संपन्न झाल्यानंतर तेथूनच भारताकडे रवाना होतील, असे या वृत्तात म्हटले आहे. तूर्तास, ऑस्ट्रेलियन संघ यानंतर इंग्लंडविरुद्ध वनडे व टी-20 मालिकेच्या तयारीवर भर देणे अपेक्षित आहे.
‘ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली, याचा अर्थ असाच होतो की, सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका होईल. या दौऱयासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात असेल, हे निश्चित आहे’, असे टेलिग्राफने पुढे नमूद केले.
इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या निर्णयावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. पण, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना यापूर्वीच सरावाची सूचना दिली असल्याने ही त्याची अनुकूल नांदी मानली जात आहे, असे या वृत्तात शेवटी नमूद आहे.
दिरंगाईमुळे बीसीसीआय आयसीसीवर नाराज
यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवणे व्यावहारिकदृष्टय़ा अशक्य आहे, याची कल्पना असली तरी आयसीसीने याबाबत ठोस निर्णय घेण्याबाबतीत चालढकल चालवली असल्याने यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बरेच नाराज आहे.
‘यंदाचे वर्ष प्रारंभापासूनच आव्हानात्मक ठरत आले आहे आणि या परिस्थितीत अनुकूल बदल होण्याचे फारसे चित्र दिसून आलेले नाही. कोणत्याही निकषावर दिलासा मिळालेला नाही. पण, प्रत्येक आव्हानातून सावरणे महत्त्वाचे असते. क्रिकेटही याला अपवाद नाही. उर्वरित कालावधीसाठी रुपरेषा निश्चित करणे हा बीसीसीआयचा प्राधान्यक्रम असेल’, असे मंडळाचे खजिनदार अरुण धुमल यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले होते. फुटबॉलमध्ये बुंदेस्लिगा, प्रीमियर लीग, ला लिगा व सिरी ए या क्लबस्तरीय स्पर्धेला यापूर्वीच सुरुवात झाली असून तोच कित्ता बीसीसीआयला क्रिकेटमध्ये गिरवायचा आहे. मात्र, आतापर्यंत बराच वेळ वाया गेला असल्याने याची मंडळाला खंत आहे. ती धुमल यांनी व्यक्त केली होती.