नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणे शक्य नसल्यास आगामी दोन्ही विश्वचषक स्पर्धेच्या स्थानांमध्ये बदल करावा, अशी सूचना माजी कर्णधार, ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी केली. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात तर 2021 मध्ये पुढील आवृत्तीची टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावसकर बोलत होते. यंदाची ऑस्ट्रेलियातील स्पर्धा भारतात खेळवली आणि पुढील वर्षी भारतातील स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळवली तर हा पेच निकाली काढता येईल, अशी गावसकरांची सूचना आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव कितपत ओसरतो, त्यावर हे सर्व अवलंबून असणार आहे.
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे जागतिक स्तरावरील सर्वच स्पर्धा, मालिका पूर्णपणे ठप्प झाल्या असून क्रिकेटला देखील याचा फटका बसला आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात दि. 18 ऑक्टोबर ते दि. 15 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणे अपेक्षित आहे. पण, ऑस्ट्रेलियातही कोव्हिड-19 ने थैमान घातले असून ऑक्टोबरपर्यंत तेथे काही बंधने लादली गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होणे कठीण असल्याचे संकेत आहेत. तूर्तास, आयसीसीने या स्पर्धेबाबत ऑगस्टमध्येच निर्णय घेता येईल, असे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.
‘पुढील वर्षातील टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. याबाबत भारत व ऑस्ट्रेलिया यांनी एकत्रित येऊन यानुसार आवश्यक करार केला आणि पुढील सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली तर दोन्ही स्पर्धा सुरळीत संपन्न होऊ शकतील. तसे झाल्यास यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीतच भारतात व पुढील वर्षातील विश्वचषक स्पर्धा त्याच कालावधीत ऑस्ट्रेलियात भरवता येईल’, असे गावसकरांचे मत आहे.
तूर्तास, बीसीसीआयने आयपीएल चषक स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली असून ती सप्टेंबरमध्ये भरवण्याचा मंडळाचा विचार आहे. असे झाल्यास आयपीएलच्या माध्यमातून विश्वचषकाची तयारी होऊ शकते. सप्टेंबरमध्ये आयपीएल झाल्यास खेळाडूंना पुरेसा सराव मिळेल व त्यानंतर नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक व डिसेंबरमध्ये अरब अमिरातमध्ये आशिया चषक स्पर्धा भरवली जाऊ शकेल, असे गावसकर म्हणतात.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 ऐवजी 5 कसोटी सामन्यांचा प्रस्ताव
सिडनी : या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यात 4 ऐवजी 5 कसोटी सामने होऊ शकतील का, यावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया चाचपणी करत आहे. कोव्हिड-19 मुळे बरेच नुकसान झाले असून त्याची काही प्रमाणात भरपाई करुन घेता यावी, यासाठी या प्रस्तावावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया विचाराधीन आहे.
सध्याच्या रुपरेषेनुसार, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये तिरंगी टी-20 मालिकेने सुरु होणार असून डिसेंबरमध्ये दोन्ही संघात कसोटी मालिका होईल. यादरम्यान टी-20 विश्वचषक स्पर्धाही होईल. पण, एकंदरीतच कोव्हिड-19 च्या जागतिक प्रकोपामुळे ही स्पर्धा होणेही कठीण असेल, असे सध्याचे संकेत आहेत.
कसोटी मालिकेत पाचवा सामना खेळवण्याचे निश्चित झाल्यास, गरजेनुसार, तो सामना वेगळय़ा शहरात आणि प्रेक्षकांविना देखील घेण्यावर आम्ही विचार करु, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केव्हिन रॉबर्ट्स म्हणाले. गरज भासत असल्यास ऑस्ट्रेलियातील यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धाही प्रेक्षकांविनाच भरवली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी येथे दिले.