आयपीएल एलिमिनेटरच्या माध्यमातून आज रंगणार ‘व्हर्च्युअल क्वॉर्टरफायनल
कोलकाता / वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धेतील एलिमिनेटर लढतीत टॉप हेवी लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध मैदानात उतरताना यापूर्वी विराटला सापडलेला सूर आणि प्ले-ऑफमधील नाटय़मय एन्ट्री यामुळे आरसीबीचे मनोबल उंचावलेले असेल. लागोपाठ अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर विराटने गुजरात टायटन्सविरुद्ध मागील लढतीत 54 चेंडूत 73 धावांची आतषबाजी केली. त्यामुळे, येथे आरसीबी अधिक निर्धाराने लढत देणे अपेक्षित आहे. आज लखनौ-आरसीबी यांच्यातील एलिमिनेटर लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
विराटला या हंगामात दोनच अर्धशतके झळकावता आली. मात्र, तरी गुजरातविरुद्ध त्याचे शैलीदार फटके डोळय़ाचे पारणे फेडणारे ठरले होते. आरसीबीने गुजरातविरुद्ध विराटच्या अर्धशतकामुळे विजय संपादन केला असला तरी प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होण्यासाठी त्यांना मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवण्याची प्रतीक्षा करणे भाग होते. पण, तरी विराटने आता हाच धडाका आजच्या लढतीतही कायम राखण्याची आरसीबीला अपेक्षा असेल.
दिनेश कार्तिकने फिनिशिंगची जबाबदारी बऱयापैकी चोख पार पाडली असून जोश हॅझलवूड, वणिंदू हसरंगा व हर्षल पटेल या अव्वल दर्जाच्या त्रिकुटामुळे त्यांची गोलंदाजीही मजबूत आहे. आयपीएल जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिलेल्या आरसीबीला यंदा जेतेपदाची अपेक्षा जरुर आहे. पण, यासाठी तिन्ही आघाडय़ांवर सरस कामगिरी साकारणे महत्त्वाचे असेल. आरसीबीचा संघ आजवर तीनवेळा (2009, 2011, 2016) फायनलमध्ये पोहोचला असला तरी प्रत्येक वेळी त्यांची निराशा झाली. यंदा मात्र तीनवेळचा आयपीएल-विनर प्लेसिसकडे धुरा असल्याने त्यांना अधिक अपेक्षा आहेत.
भारतीय स्पीडस्टार मोहम्मद सिराज (8 सामन्यात 13 बळी) अपेक्षा पूर्ण करु शकला नसला तरी हॅझलवूड, हसरंगा व हर्षल यांनी एकत्रित 57 बळी घेत वरचष्मा गाजवला आहे. या स्पर्धेतील बाद फेरीतील सामने प्रेश ट्रकवर खेळवले जाणार असल्याने याचा या त्रिकुटाला लाभ घेता येईल.
आरसीबीने 5.50 कोटी रुपयांना करारबद्ध केलेला 36 वर्षीय दिनेश कार्तिक यंदा उत्तम बहरात राहिला असून संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात त्याचाही मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यात 191.33 च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने 287 धावांची आतषबाजी केली असून यात तो 9 वेळा नाबाद राहिला आहे. आरसीबीची मजबूत फलंदाजी लखनौच्या अवेश खान-मोहसिन खान या युवा गोलंदाजांवर भारी ठरली तर त्यातही आश्चर्याचे कारण नसेल, असा होरा आहे.
संभाव्य संघ
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनूज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
लखनौ सुपर जायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
कामगिरीत सातत्य नाही, ही लखनौची मुख्य चिंता
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. मात्र, सांघिक स्तरावर कामगिरीत सातत्य नाही, ही त्यांची मुख्य चिंता राहिली. जेसॉन होल्डर व दुष्मंता चमीरा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू सातत्य राखू शकले नाहीत, ही देखील लखनौची डोकेदुखी ठरत आली आहे. केएल राहुल व क्विन्टॉन डी कॉक या सर्वोत्तम सलामी जोडीविरुद्ध आरसीबी गोलंदाजांची जुगलबंदी रंगू शकते. केएल राहुल व डी कॉक सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी राहिले असून याच जोडीने केकेआरविरुद्ध आयपीएल इतिहासातील सर्वोच्च 210 धावांची सलामी नोंदवली आहे.
केएल राहुल व डी कॉक ज्यावेळी बरसतात, त्यावेळी त्यांना रोखणे कठीण असते. पण, त्यांना अपयश पत्करावे लागल्यास मध्यफळी व तळाच्या लाईनअपमधील फलंदाज अपेक्षापूर्ती करु शकत नाहीत, याचा या संघाला फटका बसत आला आहे. लखनौचा केवळ दीपक हुडा बहरात असून त्याने या हंगामात 4 अर्धशतके साजरी केली आहेत.
मार्कस स्टोईनिस, कृणाल पंडय़ा, आयुष बदोनी व होल्डर प्रभावशाली कामगिरी करु शकले नसून आजच्या ‘व्हर्च्युअल क्वॉर्टरफायनल’मध्ये त्यांना सांघिक खेळावर अधिक भर द्यावा लागणार आहे.